महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे आयोजन असलेल्या महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 ची रविवारी समाप्ती झाली. गहूंजे येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात ईगल नाशिक टायटन्स व रायगड रॉयल्स यांनी क्रिकेटप्रेमींना थरारक सामन्याचा अनुभव दिला. ईगल नाशिक टायटन्सने रायगडवर मात करत पहिल्यांदाच एमपीएल ट्रॉफी उंचावली. मात्र, आतापर्यंत एमपीएल जिंकणाऱ्या संघाने कशाप्रकारे अंतिम सामना आपल्या नावे केला हे आपण जाणून घेऊया.
एमपीएल 2023: जवळपास 11 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने 2023 मध्ये महाराष्ट्र प्रिमियर लीगचे आयोजन केले होते. सहा संघांच्या या स्पर्धेत साखळी फेरी व क्वालिफायर 1 पर्यंत रत्नागिरी जेट्सने एकतर्फी वर्चस्व गाजवले. अंतिम सामन्यात त्यांच्यासमोर कोल्हापूर टस्कर्सचे आव्हान होते. नियोजित वेळेनुसार, हा सामना सायंकाळी होणार होता. मात्र, पावसामुळे त्यादिवशी खेळ होऊ शकला नाही. राखीव दिवशी गेलेल्या या सामन्यात कोल्हापूर टस्कर्सने 16 षटकात 8 बाद 80 धावा बनवल्या होत्या. त्यानंतर पाऊस आल्याने खेळ थांबवला गेला. पावसाने उघडीप न घेतल्याने व मैदान खराब झाल्याने अखेर, गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर राहिलेल्या रत्नागिरी जेट्सला विजेता घोषित केले गेलेले.
एमपीएल 2024: एमपीएल 2024 चे आयोजन एमसीएने पुन्हा एकदा जून महिन्यातच केले. यावेळी मात्र कमी सामन्यांना पावसाचा फटका बसला. पुन्हा एकदा रत्नागिरी जेट्सने आपला दबदबा राखत अंतिम फेरीत प्रवेश केला. तर, पहिल्या वर्षी तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या ईगल नाशिक टायटन्सने अंतिम सामन्यात जागा बनवलेली. अंतिम सामन्यात रत्नागिरी जेट्सने निखिल नाईक याच्या 36 व किरण चोरमले याच्या 35 धावांसह इतर फलंदाजांच्या छोट्या योगदानामुळे 160 अशी सन्मानजनक मजल मारली होती. या धावांचा पाठलाग करताना मुकेश चौधरी याच्या 50 धावांव्यतिरिक्त दुसरा कोणताही फलंदाज 15 धावांच्या पुढे जाऊ शकला नव्हता. दिव्यांग हिंगणेकर याने 4 बळी घेत नाशिकचा डाव 136 पर्यंत सिमित केला. रत्नागिरीने 24 धावांनी विजय मिळवत आपले विजेतेपद राखले.
एमपीएल 2025: पहिल्या दोन यशस्वी हंगामानंतर एमसीएने सलग तिसऱ्या वर्षी महाराष्ट्र प्रीमियर लीगचे आयोजन केले. दुसऱ्या हंगामात अंतिम फेरीत पराभूत झालेल्या ईगल नाशिक टायटन्सने या हंगामात आपले वर्चस्व गाजवले. पहिल्या सामन्यापासून त्यांनी सर्व संघांना पराभूत करत अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. अंतिम सामन्यात रायगड रॉयल्सविरुद्ध 191 धावांचे मोठे आव्हान त्यांच्यापुढे होते. मंदार भंडारी, अर्शिन कुलकर्णी, रणजित निकम व अथर्व काळे यांच्या आक्रमक खेळामुळे त्यांनी हे आव्हान पार करत आपले पहिले विजेतेपद पटकावले.