इराणमध्ये सध्या परिस्थिती काय? मायदेशी परतलेल्या भारतीय नागरिकांनी सांगितला अनुभव, म्हणाले तिथे दिवसेंदिवस…
GH News June 23, 2025 03:09 PM

इराण आणि इस्रायल यांच्यातील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीमुळे दोन्हीही देशात तणाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी भारत सरकारने ‘ऑपरेशन सिंधू’ ही मोहिम सुरु केली आहे. या मोहिमेअंतर्गत इराणमध्ये अडकलेल्या 285 भारतीय नागरिकांना सुखरूप मायदेशी आणण्यात आले आहे. काल सोमवारी 22 जून 2025 रात्री एका विशेष विमानाने या नागरिकांना दिल्लीत आणण्यात आले. दिल्ली विमानतळावर भारताचे परराष्ट्र राज्यमंत्री पबित्रा मार्गेरिटा यांनी त्यांचे स्वागत केले.

इराणमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुरक्षित परत आणण्यासाठी भारत सरकारने 18 जून रोजी ‘ऑपरेशन सिंधु’ सुरू केले होते. या मोहिमेच्या माध्यमातून आतापर्यंत एकूण 1713 भारतीय नागरिकांना सुखरूप मायदेशी परत आणण्यात यश आले आहे. राज्यमंत्री पबित्रा मार्गेरिटा यांनी याबाबत माहिती दिली आहे. “इराणमधून 285 भारतीय नागरिकांना घेऊन आलेले विशेष विमान नवी दिल्लीला पोहोचले आहे. या विमानात बिहार, जम्मू-काश्मीर, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्र यासह 10 राज्यांतील नागरिक होते. इराणमधून आतापर्यंत एकूण 1713 भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यात आले आहे. आम्ही पुढील 2 दिवसांसाठी इराणमधून आणखी 2-3 विमानांची व्यवस्था केली आहे. त्याचबरोबर, आम्ही इराण आणि इस्रायलमध्ये राहणाऱ्या आमच्या सर्व भारतीय नागरिकांच्या सतत संपर्कात आहोत.” असे राज्यमंत्री पबित्रा मार्गेरिटा म्हणाल्या.

भारत सरकारचे मनापासून आभार

‘ऑपरेशन सिंधू’ अंतर्गत इराणमधून सुखरूप परतलेल्या भारतीय नागरिकांनी भारत सरकारचे मनापासून आभार मानले. “मला खूप अभिमान वाटत आहे. भारतीय सरकार आणि दूतावासाने आमच्यासाठी खूप चांगली व्यवस्था केली. इराणमध्येही चांगली व्यवस्था केली होती. भारत सरकारने आम्हाला इथपर्यंत पोहोचवले. जय हिंद, जय भारत!” असे इराणमधून परतलेल्या शमा फिरोज म्हणाल्या.

भारत सरकारने आम्हाला मदत केली

मुंबईचे रहिवासी असलेले सैयद शहजाद अली जाफरी यांनी इराणमधून भारतात परततानाचा अनुभव सांगितला. “मी जियारतसाठी इराणला गेलो होतो. मी इराणमध्ये काम करतो. गेल्या 3 वर्षांपासून तिथेच आहे. भारत सरकारने आम्हाला मदत केली. आम्हाला धीर दिला, आज त्यांच्यामुळेच आम्ही इथे आहोत.” असे सैयद शहजाद अली जाफरी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची खूप आभारी

“मला स्वतःला सुरक्षित वाटत आहे. मी भारत सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची खूप आभारी आहे. इराणमधील परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली होती. तिथे राहणे खूप धोकादायक झाले होते. पण मी कृतज्ञ आहे की आता मी इथे भारतात आहे.” असे सतीर फातिमा यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.