72508
प्राथमिक शिक्षक भारतीत ११० जणांचा प्रवेश
कणकवलीत मेळावा ः शिक्षक समितीच्या कार्यपद्धतीला कंटाळून निर्णय
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २३ ः कणकवली येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती, शाखा कणकवलीच्या मेळाव्यात प्राथमिक शिक्षक समितीच्या कणकवली तालुक्यातील ११० पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी प्राथमिक शिक्षक भारतीत प्रवेश केला.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती, शाखा कणकवलीचा मेळावा रविवारी (ता. २२) जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे यांच्या अध्यक्षतेखाली कणकवली येथे झाला. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश सावंत यांच्या हस्ते उद्घाटन झाले. शिक्षक भारतीचे प्रमुख कार्यवाह संजय वेतुरेकर, राज्य संघटक किसन दुखंडे, जिल्हा सचिव मंगेश खांबळकर, संतोष कोचरेकर, श्रीराम विभूते, दशरथ शिंगारे, रामचंद्र डोईफोडे, रामचंद्र सातवसे, संजय कोळी, राधिका जगदाळे, नेहा गवाणकर आदी प्रमुख पाहुणे होते.
कणकवली तालुक्याच्या मेळाव्यात शिक्षक भारतीच्या कामाने प्रेरित होऊन, तसेच शिक्षक समितीच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन तालुक्यातील ११० हून अधिक शिक्षक प्रमुख कार्यकर्त्यांसह शिक्षक भारतीत प्रवेश करत आहेत, असे शिक्षक नेते फर्नांडिस यांनी सांगितले. फर्नांडिस यांच्यासमवेत आनंद तांबे, विनायक जाधव, प्रशांत बोभाटे, महेंद्र पवार, संदीप तांबे, दिलीप धामापूरकर, कल्पना मलये, इंदू डगरे या प्रमुख कार्यकर्त्यांसह ११० शिक्षकांनी शिक्षक समितीतून शिक्षक भारतीत प्रवेश केला. यावेळी श्री. सावंत यांनी शिक्षक भारती संघटनेला सर्वतोपरी सहकार्य करू, असे आश्वासन दिले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर भर देऊन त्यांच्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचे आवाहन केले. श्री. वेतुरेकर म्हणाले, ‘‘नवी संचमान्यता ही गावागावांतील शिक्षण व्यवस्था मोडून काढणारी असून त्या विरोधात शिक्षक भारती राज्यभर आंदोलन करेल.’’ संदीप तांबे यांनी सूत्रसंचालन केले. संजय कोळी यांनी आभार मानले.
----------
‘...म्हणून शिक्षक भारतीकडे शिक्षकांचा ओढा!’
श्री. पाताडे म्हणाले, ‘‘शिक्षक भारती ही संघटना सभासदांना गृहीत धरून न चालता प्रत्येक शिक्षक सभासद हा केंद्रस्थानी मानून चालणारी संघटना आहे. शिक्षकांचे प्रश्न अन्य संघटनांप्रमाणे दुटप्पीपणाने न हाताळता सभासदांच्या मागणीनुसार शिक्षकांचे प्रश्न प्रामाणिकपणे तडीस लावणारी संघटना असल्याने शिक्षक भारतीकडे शिक्षकांचा ओढा वाढत आहे. तसेच आज ज्या शिक्षकांनी शिक्षक भारतीवर विश्वास ठेवून प्रवेश केला आहे, त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. प्रवेशकर्त्यांमुळे शिक्षक भारती संघटना भविष्यात कणकवलीमध्येच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात प्रभावशाली होईल.’’