लंडनवरुन मुंबईला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात विचित्र घटना घडली आहे. या विमानातील 5 प्रवासी आणि 2 क्रू मेंबर्सना चक्कर आली आणि ते बेशुद्ध पडल्याची माहिती समोर आली आहे. मात्र आता विमान सुरक्षितपणे लँड झाले असून प्रवासी आणि क्रू मेंबर्स सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. विमान सुरक्षित खाली उतरल्यानंतर प्रवाशांवर वैद्यकीय पथकाने उपचार केले.
या घटनेबाबत एअर इंडियाने माहिती देताना म्हटले की, “लंडनमधील हीथ्रोहून मुंबईला जाणाऱ्या AI130 या विमानात पाच प्रवाशांनी आणि दोन कर्मचाऱ्यांना उड्डाणानंतर चक्कर आली तर काहींनी मळमळ होत असल्याती तक्रार केली. आता विमान मुंबईत सुरक्षितपणे उतरले असून वैद्यकीय पथकाने तात्काळ वैद्यकीय मदत दिली.”
पुढे बोलताना एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले की, ‘विमानातून उतरल्यानंतर दोन प्रवाशांना आणि दोन केबिन क्रू मेंबर्सना अस्वस्थ वाटत होते, त्यांना पुढील तपासणीसाठी वैद्यकीय कक्षात नेण्यात आले आणि नंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. आम्ही या घटनेची चौकशी करत आहोत.’
दरम्यान एअर इंडिया एअरलाईन्स गेल्या काही दिवसांपासून अडचणीत सापडली आहे. अहमदाबादमध्ये कंपनीचे विमान कोसळले होते, यात 270 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही समावेश होता. या घटनेनंतर एअर इंडियाच्या इतरही विमानांचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले होते.
या सर्व घटनांनंतर एअर इंडियाकडे पाहण्याचा प्रवाशांचा दृष्टिकोन बदलला आहे. अनेक प्रवाशांनी एअर इंडियाकडे पाठ फिरवली आहे. कंपनीने तिकीटाचे दर कमी केले आहेत, तरीही प्रवाशी एअर इंडियाच्या विमानातून प्रवास करताना घाबरत असल्याचे समोर आले आहे.