पावसाळ्यात दुचाकी चालवताना अशी घ्या काळजी
दरवर्षी अपघातांत होतेय वाढ
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता २२ : संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी पावसाळ्यामध्ये दुचाकीस्वारांना अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. आपला दररोजचा प्रवास सुरक्षित व्हावा, यासाठी दुचाकीस्वारांनी स्वतःसोबत आपल्या दुचाकी वाहनाचीदेखील काळजी घेतली पाहिजे, असे वाहतूक तज्ज्ञांचे मत आहे.
पावसामुळे उष्णतेपासून दिलासा मिळत असला तरी पावसाळा आपल्यासोबत आणखी अनेक समस्या घेऊन येतो. विशेषत: दुचाकी चालवणाऱ्यांसाठी पावसाळा खूप आव्हानात्मक असतो. निसरडा आणि कमी दृश्यमानता असलेल्या रस्त्यांवर अपघाताचा धोका अधिक असतो.
दुचाकींच्या टायरमध्ये हवेचा योग्य दाब ठेवणे, मुसळधार पावसात ब्रेकचा योग्य वापर करणे आणि हेडलाईट चालू ठेवणे तसेच वेग कमी ठेवल्यास अपघात टाळता येतात.
हवा योग्य प्रमाणात आहे का?
पावसाळ्यात दुचाकी चालवणाऱ्यांनी टायरमधील हवेच्या दाबाकडे वेळोवेळी लक्ष देणे आवश्यक आहे. सर्वप्रथम आपल्या दुचाकींमधील टायरच्या हवेचा दाब योग्य ठेवावा. कमी दाबाचे टायरही घसरतात आणि उच्च दाबाचे टायर रस्त्यावर कमी संपर्क साधतात. संबंधित दुचाकीच्या कंपनीने सांगितल्याप्रमाणे हवेचा दाब ठेवला पाहिजे.
टायर सुस्थितीत आहे का?
दुचाकी चालवणाऱ्यांनी पावसाळ्यात टायरची स्थिती तपासणे आवश्यक आहे. टायरची पकड चांगली असावी. टायरवर तयार झालेले खोल नाले म्हणजे ‘ट्रेड डेप्थ’ होय. या नाल्यांमुळे रस्त्यावरील पाणी काढून चांगली पकड मिळण्यास मदत होते. टायर खराब झाले असतील तर ते ताबडतोब बदलून घ्यावेत.
ब्रेक तपासून पाहा
पावसाळ्यात दुचाकी चालवणाऱ्यांनी ब्रेकचा योग्य वापर करणे अत्यंत गरजेचे आहे. ब्रेक पॅड खराब होऊ नयेत, यासाठी काळजी घेतली पाहिजे. डिस्क ब्रेकसाठी ब्रेक ऑईल पातळी योग्य असावी. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पावसात कधीही अचानक ब्रेक लावू नका. त्यामुळे आपण घसरू शकताे. तुमच्या दुचाकीमध्ये एबीएस असल्यास चांगली गोष्ट आहे.
दिवसाही हेडलाईट सुरू ठेवा
पावसाळ्यात दृश्यमानतेसह कमी प्रकाशाची समस्या सामान्य आहे. अशा परिस्थितीत रस्ते अपघाताचा धोका वाढतो. अशा तऱ्हेने पावसात दिवसाही हेडलाईट चालू ठेवा. त्यामुळे तुम्हाला रस्ता अधिक चांगल्या प्रकारे पाहता येईलच. शिवाय इतर वाहनेही तुम्हाला सहज दिसतील. ते योग्यरीत्या कार्य करीत आहेत की नाही, हे पाहण्यासाठी आपले टेललाईट आणि टर्न इंडिकेटरदेखील तपासा. हेल्मेटच्या व्हिझरकडेही लक्ष द्यावे.
परिवहन विभागाचे आवाहन
पावसाळ्यात वेळेवर दुचाकीची कामे करावीत. दृश्यमानता कमी असल्याने हेडलाईट, टेललाईट आणि इंडिकेटर तपासून घ्यावे, वायपर तपासावे, गाडीचे ब्रेक, टायरच्या हवेमधील दाब, ट्रेड डेप्थ व स्टेपनी तपासावे. पुढील वाहन व स्वत:चे वाहन यात योग्य अंतर असावे, असे परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
==
पावसाळ्यात अनेकदा ब्रेक स्किड होतात. त्यामुळे वाहन हळू चालवावे. टायर उत्तम स्थितीत असणे खूप जास्त गरजेचे आहे अन्यथा ब्रेक दाबल्यानंतर दुचाकी घसरते. त्यामुळे टायर खराब असल्यास अपघाताचा धोका वाढतो. विशेषतः दुचाकी घसरण्याचे प्रमाण अधिक आहे. पावसाळ्यात जास्त अपघात होतात. त्यामुळे वाहनचालकांनी काळजी घ्यावी.
- डॉ. शंकर विश्वनाथ, वाहतूकतज्ज्ञ