सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २३ : ‘स्वच्छ भारत मिशन’ आराखड्यातील ७७७ गावांमध्ये घनकचरा तसेच सांडपाणी व्यवस्थापनात असलेल्या सुविधांचा वापर तसेच बदललेल्या मानसिकतेची माहिती घेण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने पाहणी करण्यात येणार आहे. त्यामुळे लोकसहभागातून परिसराची स्वच्छता, प्लॅस्टिकमुक्तीची अंमलबजावणी करावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे.
जिल्ह्यात दरवर्षीप्रमाणे स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण उपक्रमामध्ये जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायती सहभागी होत असतात. केंद्र शासनाच्या वतीने प्रत्येक ग्रामपंचायतीची अद्ययावत माहिती घेऊन उभारलेल्या घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाच्या सुविधांची चाचणी, तपासणी करण्यासाठी जिल्ह्यातील विविध भागांची पाहणी पथकामार्फत होणार आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीला मिळालेल्या एक हजार गुणांपैकी प्राप्त गुणांकनाच्या आधारे जिल्ह्याचे गुणांकन ठरणार असल्याने राज्याचे गुणांकन देशपातळीवर प्रत्येक गावाने आपापल्या सुविधांचा वापर नियमित केला पाहिजे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे.
----------------------------------
असे असणार गुणांकन
घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाच्या सुविधांबाबत थेट निरीक्षणासाठी १२० गुण आहेत. प्रतिसादासाठी १०० गुण, गावातील सुविधांच्या वापराबाबत २४० गुण, तर प्रत्यक्ष पाहणी व निरीक्षणादरम्यान ५४० गुणांची प्रश्नावली असणार आहे. त्यातून मिळणाऱ्या गुणांकातून देशातील, महाराष्ट्रातील सर्वात स्वच्छ सुंदर गाव, ग्रामपंचायत घोषित होणार आहे.
-------------------------------
गावभेटीतून प्रत्यक्ष निरीक्षण
त्रयस्थ संस्थेमार्फत गावातील सुविधांचा वापर तसेच बदललेल्या मानसिकतेबाबत ‘कुटुंबांच्या भेटी शिवाय’ हा उपक्रम कायमस्वरूपी ठेवण्यासाठी गावपातळीवर झालेली उपाययोजना सहभाग इत्यादी बाबींची प्रामुख्याने पाहणी होणार आहे. गावभेटीदरम्यान प्रत्यक्ष निरीक्षण करताना स्वच्छता सुविधांचे निरीक्षण, ग्रामस्थांचा सहभाग जनजागृती दृश्यमान स्वच्छता इत्यादीबाबत पाहणी होणार आहे.