इंग्लंड दौऱ्यातील पहिल्याच सामन्यात भारतीय फलंदाजी चमकली आहे. दोन्ही डावात भारतीय फलंदाजांनी शानदार फलंदाजी केली. त्यामुळे हेडिंग्ले येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटीत भारताला इंग्लंडसमोर चौथ्या डावात ३७१ धावांचे मोठे लक्ष्य ठेवता आले आहे. यामध्ये केएल राहुल आणि रिषभ पंत यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. या दोघांनीही दुसर्या डावात शतके केली. त्यामुळे या सामन्यात ७० वर्षांनंतर एक खास योगायोगही पाहायला मिळाला आहे.
या सामन्यात चौथ्या दिवशी (२३ जून) भारताने दुसऱ्या डावात २३.५ षटकापासून आणि २ बाद ९० धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली. त्यावेळी कर्णधार शुभमन गिल ६ धावांवर आणि केएल राहुल ४७ धावांवर नाबाद होते. त्यांनी चांगली सुरुवात करण्याचा प्रयत्न केला पण चौथ्या दिवसाच्या सुरुवातीलाच २५ व्या षटकात बाद झाला. त्याला ब्रायडन कार्सने त्रिफळाचीत केले.
KL Rahul Century: संकटमोचक राहुल! शतकासह बनला इंग्लंडमधील भारताचा 'नंबर वन' ओपनर; द्रविड-गावसकरांना टाकले मागेपण त्यानंतर रिषभ पंतची भक्कम साथ केएल राहुलला मिळाली. बघता बघता या दोघांमध्ये दीडशतकी भागीदारी झाली. त्यामुळे भारताच्या आशा पल्लवित झाल्या. केएल राहुलने २०२ चेंडूत त्याचे नववे कसोटी शतक आणि इंग्लंडमधील तिसरे शतक पूर्ण केले. तो इंग्लंडमध्ये ३ शतके करणारा पहिला भारतीय सलामीवीर ठरला.
त्याच्यापाठोपाठ लगेचच आक्रमक खेळणाऱ्या रिषभ पंतनेही शतक पूर्ण केले. हे त्याचे आठवे, तर या सामन्यातील दुसरे शतक ठरले. त्यामुळे तो भारताकडून इंग्लंडमध्ये एकाच कसोटी सामन्यात दोन शतके करणारा पहिला फलंदाज ठरला आहे.
दरम्यान, रिषभ शतकानंतरही आक्रमक खेळत होता. पण अखेर त्याचा अडथळा शोएब बशीरने ७२ व्या षटकात त्याला झॅक क्रावलीच्या हातून झेलबाद करत दूर केला. रिषभने १४० चेंडूत ११८ धावांची खेळी केली. यात त्याने १५ चौकार आणि ३ षटकार मारले.
त्याच्यानंतर करूण नायरने काही काळ केएल राहुलची साथ दिली, पण केएल राहुलला ८५ व्या षटकात ब्रायडन कार्सने त्रिफळाचीत केले. केएल राहुलने २४७ चेंडूत १८ चौकारांसह १३७ धावा केल्या.
त्याच्यानंतर ख्रिस वोक्सने ८६ व्या षटकात करुण नायरलाही त्याच्याच गोलंदाजीवर झेल घेत ३० धावांवर बाद केले, तर शार्दुल ठाकूरला ४ धावांवर जोश टंगने ९१ व्या षटकात बाद केले. त्याच्यापुढच्याच चेंडूवर मोहम्मद सिराजलाही टंगने जॅमी स्मिथच्या हातून झेलबाद केले. दोन चेंडूंनंतर टंगने जसप्रीत बुमराहलाही शून्यावर त्रिफळाचीत केले.
Rishabh Pant Celebration: अरे कोलांटीउडी मार ना! गावसकरांच्या इशाऱ्यावर रिषभने मैदानातूनच काय दिली रिअॅक्शन? Video ने जिंकली मनंतरी शेवटच्या विकेटसाठी रवींद्र जडेजाने प्रसिद्ध कृष्णासोबत फलंदाजी करताना काही आक्रमक शॉट्स खेळले. पण ९६ व्या षटकात प्रसिद्ध मोठा शॉट खेळण्याच्या प्रयत्वात जोश टंगकडे झेल देत शून्यावर बाद झाला. जडेजाने नाबाद २५ धावा केल्या.
त्यामुळे भारताचा डाव ९६ षटकात ३६४ धावांवर संपुष्टात आला. पण पहिल्या डावात घेतलेल्या ६ धावांच्या आघाडीमुळे भारताने इंग्लंडसमोर ३७१ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. या डावात तिसऱ्या दिवशी भारताकडून यशस्वी जैस्वाल ४ धावांवर बाद झाला होता. तसेच साई सुदर्शन ३० धावांवर बाद झाला होता.
इंग्लंडकडून या डावात गोलंदाजी करताना ब्रायडन कार्स आणि जोश टंग यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. तसेच शोएब बशीरने २ विकेट्स घेतल्या, तर ख्रिस वोक्स आणि कर्णधार बेन स्टोक्स यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
दरम्यान, पहिल्या डावात भारताकडून यशस्वी जैस्वाल (१०१), शुभमन गिल (१४७) आणि रिषभ पंत (१३४) यांनी शतके केली होती. त्यामुळे भारताने ११३ षटकात सर्वबाद ४७१ धावा केल्या होत्या. आता दुसऱ्या डावात केएल राहुल आणि रिषभ पंत यांनीही शतके केली. त्यामुळे एकाच सामन्यात भारताकडून ५ शतके झाली आहेत.
त्यामुळे ७० वर्षांनंतर परदेशी दौऱ्यात एखाद्या संघाकडून एकाच कसोटी सामन्यात ५ शतके होण्याचा पराक्रम झाला आहे. तसेच भारताकडून ९३ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच परदेशात एकाच कसोटी सामन्यात ५ शतके झाली आहेत.
७० वर्षांपूर्वी १९५५ साली ऑस्ट्रेलियाकडून वेस्ट इंडिज दौऱ्यात किंग्स्टन येथे खेळताना कसोटी सामन्यात ५ शतके झाली होती. त्यावेळी कॉलीन मॅकडोनल्ड (१२७), नील हार्वे (२०४), केथ मिलर (१०९), रॉन आर्चर (१२८) आणि रिची बेनॉड (१२१) यांनी ऑस्ट्रेलियाकडून शतके केली होती. तो सामना ऑस्ट्रेलियाने एक डाव आणि ८२ धावांनी जिंकला होता.
दरम्यान, सध्या सुरु असलेल्या हेडिंग्ले कसोटीत इंग्लंडने पहिल्या डावात १००.४ षटकात सर्वबाद ४६५ धावा केल्या होत्या. त्यांच्याकडून ऑली पोपने १०६ धावांची खेळी केली होती, तर हॅरी ब्रुकने ९९ धावा केल्या होत्या, बेन डकेटने ६२ धावांची खेळी केली होती.भारताकडून गोलंदाजी करताना जसप्रीत बुमराहन ५ विकेट्स घेतल्या होत्या.