नाशिक- इतिहासाचे स्मरण करून देणारे गड-किल्ले संवर्धनाचे उत्कृष्ट कार्य खासदार नीलेश लंके यांनी हाती घेतले आहे. गड-किल्ल्यांच्या संवर्धनातून इतिहासाचे जतन होईल आणि मराठी माणसाला अभिमानाचे स्फूरण चढेल, असे हे कार्य असल्याचे गौरवोद्गार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काढले.
दर महिन्यातील एक दिवस गडकिल्ल्यांसाठी या मोहिमेंतर्गत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी रविवारी (ता. २२) दिंडोरी तालुक्यातील आशेवाडी रामशेज किल्ल्यास भेट दिली. या वेळी माजी मंत्री जयंत पाटील, दक्षिण अहिल्यानगरचे खासदार नीलेश लंके, दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे, नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे, आमदार सुनील भुसारा, ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे, जिल्हाध्यक्ष दत्तात्रेय पाटील, प्रदेश उपाध्यक्ष कोंडाजी आव्हाड, युवा नेते उदय सांगळे, नाना पिंगळे, पुरुषोत्तम कडलग, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष डॉ. योगेश गोसावी, पराग भगरे आदींसह मोठ्या संख्येने नागरिक यावेळी उपस्थित होते.
या वेळी खासदार भास्कर भगरे म्हणाले, इतिहासकालीन गडकिल्ल्यांचे संवर्धन होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने खासदार लंके यांनी सुरू केलेला हा उपक्रम अतिशय स्तुत्य असून, त्यासाठी लागणारे सर्वोतोपरी सहकार्य आम्ही करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. खासदार नीलेश लंके यांनी महिन्यातील एक दिवस गडकिल्ल्यांचे संवर्धन करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
त्यानुसार रविवारी भर पावसात रामशेज किल्ल्यांवर पाच ते सहा फुट उंच शंभरपेक्षा अधिक रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. तसेच सोलर दिवे, स्वागत कमान, स्वच्छता राखण्याचे सूचना फलक, कचराकुंडी, बसण्यासाठी बाकडे यावेळी व्यवस्थितरित्या ठेवण्यात आले. या उपक्रमात सूर्या अकादमीच्या युवकांनी सहभाग नोंदविला.
गडसंवर्धनाचे प्रश्न
गड-किल्ले संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेच्या सभासदांनी या वेळी हजेरी लावली. रामशेज किल्ल्याचे ढासळत असलेले बुरुज, मुख्य प्रवेशद्वाराची भग्नावस्था आदी प्रश्न त्यांनी माजी मंत्री जयंत पाटील यांच्यासमोर मांडले. तसेच, राज्यातील गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी धोरणात्मक उपाययोजनांची आवश्यकता असल्याचे या संस्थेचे अध्यक्ष राम खुर्दळ यांनी सांगितले.
Pune News : पत्नीचा खून करणाऱ्या पतीला जन्मठेपपावसामुळे नेत्यांची अडचण
रामशेज किल्ल्याच्या पायथ्याशी वाहने पार्क करून नेत्यांनी चालत किल्ला गाठला. किल्ला संवर्धनाचे कार्य पार पाडत असताना जोरदार पावसाने हजेरी लावली. पावसाच्या सरी अंगावर झेलत नेत्यांना खाली उतरावे लागले. छत्रीचा आसरा घ्यावा तर हवेचा वेग इतका होता, की छत्री काही सेकंदात उलटी व्हायची. त्यामुळे पावसाचा आनंद घेत नेत्यांनी रामशेज किल्ल्याची मोहीम फत्ते केली.