- आशा नेगी, लेखिका, कॅन्सर जनजागृतीसाठी कार्यरत
कॅन्सर... नाव ऐकताच मन घाबरतं. शरीर थरथरतं आणि भविष्य धूसर वाटायला लागतं; पण खरं सांगायचं झालं, तर कॅन्सर हे काही आयुष्याचं शेवटचं पान नाही. तो फक्त नावडत्या पुस्तकातला एक धडा आहे - आणि त्यानंतर अजून अनेक सुंदर पाने आपल्याला लिहायची असतात.
कॅन्सर हा एका टप्प्यावर येऊन गेलेला अंधार असतो; पण तो काही कायमस्वरूपी नसतो.. कारण अंधारानंतर येणारा प्रकाश खूप महत्त्वाचा असतो. त्यामुळे आयुष्यात अचानक आलेल्या या पाहुण्याच्या विचारांना, टेन्शनला, प्रेशरला जास्त वेळ देण्यापेक्षा आपलं रूटिन आयुष्य जगणं आणि आपले छंद जोपासणंही महत्त्वाचं आहे.
नको त्या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा आवडत्या गोष्टींमध्ये मन जमवलं, तर तीच आपल्याला या अडचणीतून बाहेर निघण्यास मदत करते. कारण आनंदी मन सगळ्या गोष्टींसाठी सामोरं जाण्यासाठी सज्ज असतं. तीच आपली खरी ताकद असते.
चित्र काढणं, गाणं म्हणणं, पुस्तक वाचणं, नवे पदार्थ बनवणं, बागकाम, कविता, कथालेखन, नृत्य, योगा, फोटोग्राफी... हे सगळं म्हणजे आपल्या मनाचं, आत्म्याचं खाद्य. शरीराला औषधं लागतात, त्याच प्रकारे मनाला हसण्यासाठी, जगण्यासाठी, उठून उभं राहण्यासाठी आपल्या आवडीनिवडी लागतात.
कॅन्सर सेंटरमधलं दृश्यच वेगळं असतं. तिथं रुग्ण खुर्चीत बसलेले असतात. काही थकलेले, काही उद्याची चिंता डोळ्यात घेऊन शांततेत हरवलेले... पण ती शांतता म्हणजे फक्त शांतता नसते, ती असते डोक्यात चाललेली धावपळ... पण अशा वातावरणात एक गोडसं गाणं वाजायला लागलं, किंवा कुणी एखादी रंगांची कार्यशाळा सुरू केली तर?... मग बघा काय जादू होते!
ज्यांनी स्वतःला केवळ ‘रुग्ण’ म्हणून पाहायला सुरुवात केली होती, त्यांना पुन्हा त्यांच्यातल्या कलात्मतेची जाणीव होते... स्वतःतील गायकाची, कवीची किंवा आणखी कुणाची. त्यातून लखकन् जाग येते आणि चेहऱ्यावर फुलतं एक हसू... जे केमो थांबवत नाही. रिपोर्टही थांबवत नाही... काही क्षणांसाठी का होईना; पण त्या रुग्णांमध्ये ‘रोग’ नव्हता... त्यांच्यात ‘रंग’ होता. ते गाणं आणि रंग फक्त मनोरंजन नव्हतं... ते त्यांच्या आतल्या जिवंतपणाचं आठवण करून देणारे क्षण होते.
कारण छंद आपल्याला ‘मी आजारी नाही, मी अजूनही पूर्ण आहे!’ याची सतत आठवण करून देत राहतात. ते आजाराला ओळख देत नाहीत, तर व्यक्तीला ओळख मिळवून देतात. ज्याला आयुष्याने प्रश्न विचारले, त्यानं उत्तरं आपल्या छंदांमधून शोधली पाहिजेत.. तरच कॅन्सरचा प्रवास आपला आनंदाने पार पडेल.
आजार कितीही मोठा असो; पण आपल्या स्वप्नांपेक्षा मोठा नसतो. आज एखादा कॅन्सर पेशंट हे वाचत असेल, तर मी त्याला एवढंच सांगेन ‘तू आजारी आहेस; पण हरलेला नाहीस. तू अजूनही तोच व्यक्ती आहेस - जो पुस्तकं लिहीतो, जो हार्मोनियमवर सूर लावतो, जो कुंडीत फुलं फुलवतो, जो प्रेम करतो, हसतो, जगतो!’
माझ्या सर्जरीनंतरचा तिसराच दिवस होता. शरीर थोडं थकलेलं होतं; पण मनात एक अनाम ओढ- काहीतरी पाहायची, अनुभवायची... आणि त्याच क्षणी पावसाची भुरभुर सुरू झाली. मला पावसात भिजायला कायम आवडतं... अगदी लहानपणापासून. त्या दिवशीही काहीसं तसंच झालं.
डोळे मिटले... आणि बाल्कनीत उभी राहिले. हळूहळू पावसाचे थेंब माझ्या चेहऱ्यावर आले... गालांवरून ओघळले... गुदगुल्या करत, मनाला स्पर्शून गेले. तो फक्त पाऊस नव्हता... तो ‘माझा’ पाऊस होता ओळखीचा, आपलासा, शांत करणारा.
त्या क्षणी असं वाटलं, माझ्या आवडीनिवडी, माझं हसणं, माझा आनंद... हीच तर माझी खरी ताकद आहे! मन सर्जरी, ट्रीटमेंट, केमो वगैरेंची आठवण करून देत होतं... पण पाऊस सांगत होता, ‘काय हरवलंय, यापेक्षा काय उरलंय याची किंमत करायला शिक.’ तो पाऊस माझ्यासाठी फक्त निसर्ग नव्हता, तो एक शांत गुरू होता जो सांगून गेला की आनंद शोधावा लागत नाही..
कारण तो नेहमी आपल्या आत असतो! कॅन्सर हा फक्त आयुष्याचा एक छोटासा भाग असतो; पण आपले छंद, आपल्या आवडीनिवडी म्हणजेच आपलं पूर्ण आयुष्य असतं. आणि म्हणूनच कॅन्सर आहे; पण खंत नाही, छंदांसोबत माझं आयुष्य अजूनही थांबत नाही.