अमरावती - शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा येत्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी न केल्यास ती बच्चू कडू यांची नाही तर शेतकऱ्यांची फसवणूक असेल. त्याचे परिणाम त्यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भोगावे लागतील, असा इशारा ‘प्रहार’ संघटनेचे प्रमुख माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिला.
बॅंकांकडून सक्तीची कर्जवसुली थांबविणे व सातबारा कोरा, या कर्जमाफीसाठी पुन्हा एल्गार पुकारण्याची घोषणा त्यांनी विश्राम भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत केली.
ते म्हणाले, ‘अन्नत्याग आंदोलनावेळी राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याची वेळ आली आहे. मुख्यमंत्र्यांनी समिती स्थापन करून अहवाल आल्यानंतर योग्य वेळी कर्जमाफी जाहीर करण्याचे सूतोवाच केले आहे.
मात्र योग्य वेळ कोणती ते त्यांनी स्पष्ट केले नाही. पावसाळी अधिवेशनात घोषणा होणे अपेक्षित आहे. विरोधी पक्षांनी तसा प्रस्ताव मांडावा, यासाठी शेतकऱ्यांनी आमदारांना संदेश पाठवावा,’ असे आवाहनही त्यांनी केले.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत असतानाही कर्जमाफीची योग्य वेळ येत नाही, अशी टीका त्यावेळी मविआवर करणारे फडणवीस यांनी आता त्यांची योग्य वेळ स्पष्ट करावी. सक्तीची कर्जवसुली न थांबविल्यास अधिकाऱ्यांचे थोबाड रंगवू, असा इशाराही त्यांनी दिला.
अपात्रताप्रकरणी कडू यांना दिलासा
नागपूर - नाशिक येथील एका मारहाण प्रकरणी शिक्षा सुनावण्यात आल्याचा हवाला देत अमरावती जिल्हा सहनिबंधक (सहकारी संस्था) यांनी बच्चू कडू यांना जिल्हा बॅंक अध्यक्षपदावरून अपात्र ठरविले होते. मंगळवारी (ता. २४) उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या अपात्रतेला अंतरिम (तात्पुरती) स्थगिती दिली. त्यामुळे कडू यांना दिलासा मिळाला आहे.