पंढरपूर - उजनी आणि वीर धरणातून सोडण्यात आलेले पाणी पंढरपुरातील चंद्रभागेत पोचले आहे. मंगळवारी सायंकाळी चंद्रभागेच्या काठी पूरस्थिती निर्माण झाली आहे तर वाळवंटातील भक्त पुंडलिक मंदिरासह इतर साधुसंतांची मंदिरे पाण्याखाली गेली आहेत.
जुना दगडी पूलही पाण्याखाली गेल्याने तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. दरम्यान, भाविकांनी स्नानासाठी चंद्रभागेच्या पात्रात उतरू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
पुणे जिल्ह्यातील पावसाने उजनीत येणारी पाण्याची आवक देखील वाढली आहे. ऐन आषाढी वारी काळातील संभाव्य पुराचा धोका टाळण्यासाठी उजनी धरणातून भीमा नदीपात्रात विसर्ग सुरू केला आहे. मंगळवारी दुपारी तो ४० हजार क्युसेक इतका वाढविण्यात आला आहे. तर वीर धरणातून नीरा नदीमध्ये २२ हजार ३६० क्युसेक विसर्ग सोडला आहे.
आषाढीत पूरपरिस्थिती टाळण्यासाठी प्रयत्न
आषाढी वारीचा सोहळा तोंडावर आला आहे. ऐन वारी काळात पंढरपुरात पूरस्थिती निर्माण होऊन भाविकांची गैरसोय होणार नाही, यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी उजनीतून भीमा नदीत पाणी सोडण्याच्या सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार आवश्यकतेनुसार धरणातून भीमा नदीत पाणी सोडले जात आहे. सुरवातील १० हजार, त्यानंतर १५ हजार तर आज ४१ हजार क्युसेक इतका विसर्ग वाढविण्यात आला आहे. शिवाय वीर धरणातूनही २२ हजार क्युसेक विसर्ग नीरेत सोडण्यात आला आहे.