Palghar News: निकणे गावचा ५० वर्ष जुना पूल धोकादायक, ग्रामस्थांचा प्रवास ठरतोय जीवघेणा; प्रशासनाचे दुर्लक्ष
esakal June 25, 2025 10:45 AM

कासा : डहाणू तालुक्यातील निकणे गाव आणि परिसरातील १२ पाड्यांसाठी जीवनरेषा ठरलेला अंदाजे १९७५ मध्ये बांधलेला पूल आजही धोकादायक अवस्थेत आहे. सरकारच्या उदासीनतेमुळे हजारो ग्रामस्थ संकटात आहेत.

गेल्या ५० वर्षांत सातत्याने दुरुस्तीची मागणी करूनही या पुलाकडे लक्ष दिलेले नाही. परिणामी, आजही नागरिकांना जीव मुठीत धरून पुलावरून प्रवास करावा लागतो. दैनंदिन मृत्यूच्या छायेखाली गावकरी या पुलावरून बैल, बैलगाड्या, दुचाकी, पिकअप, ट्रॅक्टर आणि पादचारी प्रवास करतात.

या पुलावरून अनेक अपघात घडले आहेत. काही प्रकरणांमध्ये नागरिकांचा मृत्यूही झाला. पुलाची अवस्था इतकी वाईट आहे की तो पावसात हलतो आणि चिखाळलेल्या लाकडी फरशा थेट मृत्यूला आमंत्रण देत असल्याचा अनुभव ग्रामस्थ सांगतात. ग्रामस्थांनी अनेक वर्षांत पूल दुरुस्तीविषयी निवेदने दिली, अर्ज केले, लोकप्रतिनिधींकडून मागण्या केल्या; पण अजूनही ठोस निर्णय झालेला नाही.

पुरामुळे पाच तास गावांचा संपर्क तुटतो

एकच पूल १२ गावांचा आधार आहे. निकणे, घाटाळपाडा, देसकपाडा, सुतारपाडा, गावठणपाडा, दाभीपाडा, इभाडपाडा, वधना-वाकीपाडा, उर्से, म्हसाड, दाभोन सगदेव आणि पेठ या १२ गावांचा संपर्क एकट्या या पुलावर आधारित आहे. मात्र, जोरदार पावसात नदीला पूर आल्यास सलग पाच तासांपेक्षा अधिक वेळ गावांचा बाह्य जगाशी संपर्क तुटतो. त्यामुळे शाळकरी विद्यार्थी, आजारी रुग्ण, गरोदर माता यांना वेळेवर मदत मिळत नाही.

शासनाच्या निष्काळजीपणावर संताप

या धोकादायक पुलाची तातडीने पाहणी करून नव्या पुलाचे काम युद्धपातळीवर हाती घ्यावे, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे. पावसाळ्यात पूर आला की, ‘आज कमावतो, आज खातो’ या तत्त्वावर जगणाऱ्या कुटुंबांचे रोजंदारीचे नुकसान होते. वैद्यकीय गरजांमध्ये अडथळा निर्माण होतो. विशेषतः गरोदर महिला, आजारी वृद्ध आणि लहान मुलांसाठी ही परिस्थिती जिवावर बेतणारी ठरत आहे. त्यामुळे शासनाने लक्ष देऊन या पूलाची दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.