मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतांची चोरी करून भाजप युती सत्तेत आल्याचे पुरावे दररोज समोर येत आहेत. राहुल गांधी यांनी सातत्याने या मतचोरीचे प्रकरण लावून धरले. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या कामठी मतदारसंघातील मतांचा घोळ उघड केल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर दक्षिण मतदारसंघात 5 महिन्यात 8 टक्के मतदार वाढल्याचे उघड झाले. भाजपची मतचोरी पकडली गेल्याने देवेंद्र फडणवीसांनी नैतिक जबाबदारी स्विकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. (Congress harshawardhan sapkal demand resignation of CM Devendra Fadnavis)
हेही वाचा : Fadnavis Vs Rahul Gandhi : झूठ बोले कौवा काटे…, राहुल गांधींच्या दाव्याला फडणवीसांचे प्रत्युत्तर
यासंदर्भात प्रतिक्रीया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, “महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातील मतदारयादीत अवघ्या 5 महिन्यांत 8 टक्के वाढ झाली आहे. काही बूथवर ही वाढ 20 ते 50 टक्के झालेली दिसत आहे. अज्ञात व्यक्तींनी मतदान केल्याचे बीएलओंनी नोंदवले आहे. पण निवडणूक आयोग मात्र गप्प असून ही मतचोरीच आहे म्हणूनच काँग्रेस पक्षाने मशीन-रीडेबल डिजिटल मतदार यादी तसेच सीसीटीव्ही फुटेज त्वरित प्रसिद्ध करण्याची मागणी केलेली आहे. लोकसभा निवडणुकीत दारूण पराभव झालेल्या भाजपा युतीला अवघ्या 5 महिन्यात विधानसभा निवडणुकीत प्रचंड मोठा विजय कसा मिळू शकतो, हाच कळीचा प्रश्न आहे. या पाच महिन्यात भाजपाने निवडणूक आयोगाच्या मदतीने मतदारयाद्यात घोळ केला आणि मतदानाची संख्या वाढवली. संध्याकाळी 5 वाजल्यानंतर झालेले मतदान आणि दुसऱ्या दिवशी जाहीर केलेली मतदानाची आकडेवारी यामध्ये तब्बल 8 टक्क्यांची तफावत आहे. हे मतदान कसे वाढले? याचे समाधानकारक उत्तर आजपर्यंत निवडणूक आयोग देऊ शकलेले नाही. उलट आता माहितीच देता येणार नाही असा नियम बनवला. तसेच 45 दिवसानंतर सर्व सीसीटीव्ही फुटेज डिलीट करण्याचा निर्णयही घेतला आहे. हे सर्व मतचोरी लपवण्याचा प्रकार आहे, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी म्हटले आहे.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा मुद्दा लावून धरला आहे. मंगळवारी (24 जून) सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत राहुल गांधी म्हणाले की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वतःच्या मतदारसंघातील मतदारांच्या यादीत अवघ्या 5 महिन्यांत 8 टक्क्यांची वाढ झाली आहे. काही बुथवर 20 ते 25 टक्क्यांची वाढ झाली आहे. एवढेच नव्हे तर, बीएलओंनी अज्ञात व्यक्तींनी मतदान केल्याचे नोंदवले आहे. पत्त्याची पडताळणी नसलेले हजारो मतदारही माध्यमांनी उघड केले असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.