Malvan Rain Alert : सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाच्या जोरदार सरी सुरू आहेत. वादळी वाऱ्यामुळे काही घरांवर झाडे कोसळून लाखो रुपयांचे नुकसान झाले. काही मार्गांवर झाडे कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली. जोरदार पावसामुळे या भागातील नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. जिल्ह्यात पावसाचा जोर पुढील काही दिवस कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. पुढील चार-पाच दिवस यलो अलर्ट दिला असून, मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
जिल्ह्यात सोमवारी (ता. २३) पहाटेपासून जोरदार पाऊस सुरू आहे. सकाळपासूनच पावसाच्या सरींवर सरी कोसळत होत्या. दुपारनंतर पावसाचा जोर वाढला. कणकवली आणि वैभववाडी तालुक्यांना पावसाने झोडपून काढले. दोन्ही तालुक्यांत रात्री उशिरापर्यंत मुसळधार पाऊस सुरू होता. या पावसामुळे वैभववाडी तालुक्यातील शुक, शांती, करूळ, कुसूर, अरुणा या सर्व नद्या दुथडी भरून वाहत होत्या. याशिवाय कणकवली तालुक्यातील गड आणि जानवली नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली होती. आज सकाळपासून देखील जिल्ह्याच्या सर्व भागांत जोरदार पाऊस सुरू झाला.
वादळी वाऱ्यासह पाऊस पडत असल्याने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. वैभववाडी तालुक्यात वादळी वारे वाहत आहेत. एडगाव येथील प्रमिला भिकाजी पाष्टे यांच्या राहत्या घरावर रात्री दीड वाजण्याच्या सुमारास चिंचेचे झाड कोसळले. सुदैवाने घरातील दोघेही बचावले. वैभववाडी-फोंडा मार्गावर गडमठ फाट्यावर रस्त्यावर झाड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक अर्धा तास ठप्प झाली. लोरे येथील गुरुनाथ डोंगरे यांच्यासह काही ग्रामस्थांनी झाड हटवून वाहतूक सुरळीत केली. लोरे येथील परशुराम गोसावी यांच्या घराचे पत्रे उडाले.
वैभववाडी तालुक्यात लाखो रुपयांची हानी झाली. कुडाळ, सावंतवाडी तालुक्यांत देखील पावसाचा जोर होता. पावसामुळे काही ठिकाणी पडझडीचे प्रकारही झाले. जिल्ह्याच्या विविध भागात वीजप्रवाह खंडित झाला होता. पणदूर, वेताळबाबंर्डे, हुमरमळा या गावांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला.
Ratnagiri Flood News: रत्नागिरीतील खेड शहर पाण्याखाली | Kokan Rain Update | Sakal Newsतालुकानिहाय पाऊस
वैभववाडी ८७ मि.मी., कणकवली ८० मि.मी., सावंतवाडी ४७ मि.मी., कुडाळ ५५ मि.मी., वेंगुर्ले २० मि.मी., मालवण १० मि.मी., देवगड २९ मि.मी., दोडामार्ग २९ मि.मी.
मालवण किनारी जोरदार लाटांचा तडाखा
कोकण किनारपट्टीवर अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला असून, समुद्रात उंचच उंच लाटा उसळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर आज सायंकाळपासून येथील किनारी पाण्याची पातळी वाढून जोरदार लाटांनी धडक देण्यास सुरुवात केली आहे.
गेले दोन दिवस पावसाचा जोर काहीसा कमी झाला असताना हवामान विभागाने पुन्हा अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. पुढील २४ तासांसाठी कोकण किनारपट्टीवर ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
आज सायंकाळी ५.३० वाजल्यापासून उद्या (ता. २५) रोजी रात्री ८.३० वाजेपर्यंत कोकण किनारपट्टीवर ४ ते ४.२ मीटर उंच लाटांचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, अशा सूचना आहेत. मालवणात समुद्र खवळलेला असून सायंकाळपासून समुद्राच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्याचे दिसून आले. राजकोट ते रॉकगार्डन या खडकाळ किनाऱ्याला लाटांचा जोरदार तडाखा बसत होता.