Mumbai Water Supply: मुंबईकरांची पाण्याची चिंता वाढली, धरणांच्या पातळीत घट
esakal June 26, 2025 04:45 AM

मुंबई : मुंबईला पाणी पुरविणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू होता. मात्र पावसाचे प्रमाण घटू लागले आहे. त्यामुळे पुन्हा जलसाठ्याबाबत पालिकेच्या मुंबईकरांना चिंता वाटू लागली आहे.

आज सकाळपासून तलावांकडे पावसाने पाठ फिरवल्याचे दिसून आले. अप्पर वैतरणा २७ मिलीमीटर , मोडकसागर १५ मिलीमीटर, तानसा ७ मिलिमीटर मध्य वैतरणा भातसा २७ मिलीमीटर आणि भातसा २ मिलीमीटर असा तुरळक पाऊस पडला. मुंबईतही पावसाने उघडीप घेतली आहे. तशी तलाव क्षेत्रातूनही पाऊस कमी होत असल्याचे दिसून येत आहे.

गेल्या पावसाने जोरदार सलामी दिली होती, त्यामुळे तलावांमध्ये जलसाठ्याची पातळी वाढत होती. मात्र आता पाऊस कमी झाल्याने जलसाठ्याची पातळी कमी झाली आहे. त्यामुळे तलाव क्षेत्रात पावसाची प्रतिक्षा आहे. परंतु पावसाचे प्रमाण कमी झाल्याने मुंबईकरांनी चिंता व्यक्त केली आहे.

मुंबईला दररोज ३,८५० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. मुंबईला पावसाळा संपल्यावर १ ऑक्टोबरपासून पुढील वर्षभरासाठी सात तलावांत मिळून एकूण १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर इतक्या पाणीसाठ्याची गरज असते. त्यामुळे मुंबईकरांना वर्षभर पाणीकपातीच्या संकटाला तोंड द्यावे लागत नाही.

Electricity Price Fall: मोठी बातमी! राज्यातील ग्राहकांना दिलासा, वीजदरात कपात, पण किती रुपयांनी?

मात्र जर पाणीसाठा कमी असेल तर मुंबईकरांवर किमान ५ टक्के ते २० टक्के इतक्या पाणीकपातीच्या संकटाला तोंड द्यावे लागते. त्यामुळे तलाव क्षेत्रात अजून पावसाची गरज आहे. सद्या सर्व तलावांमध्ये मिळून ५ लाख ६ हजार ८९० दशलक्ष लिटर जलसाठा उपलब्ध असल्याची माहिती जलअभियंता विभागाने दिली.

दोन महिने पावसाचे

जुलै आणि ऑगस्ट महिने पावसाचे आहेत. अजूनही चागला पाऊस पडू शकतो. मुंबईचे सर्वच्या सर्व तलाव भरतील, त्यामुळे चिंता करण्याचे कारण नाही अशी माहिती जलअभियंता विभागाने दिली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.