मुंबई: “देशातील तत्कालीन परिस्थितीमुळे इंदिरा गांधी यांना आणीबाणीचा निर्णय घ्यावा लागला होता. त्यावेळी झालेल्या काही घटनांवर इंदिरा गांधी, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी प्रशासनाकडून काही चूका झाल्याचे मान्य केले. पण भाजपा मात्र आणीबाणीवर फक्त कांगावा करत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी आणीबाणीचे समर्थन केले होते. तसेच जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनाशी संघाचा संबंध नाही असेही जाहीर केले होते. भाजपाला बाळासाहेब देवरसांची भूमिका मान्य नाही का?” असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारला आहे. (Congress on Emergency 50 years and Harshavardhan Sapkal targetted BJP)
हेही वाचा : Wadettivar on BJP : राज्य कर्जबाजारी पण चांदीच्या ताटाचा थाट; वडेट्टीवारांची सरकारवर टीका
टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपाचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले की, पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 1975 साली आणीबाणी लागू करण्याचा जो निर्णय घेतला होता तो संविधानिक होता. देशात काही शक्ती अराजक निर्माण करू पहात होत्या. नंतर आणीबाणी उठवून निवडणुका घेतल्या आणि लोकशाही प्रक्रिया पार पाडली. इंदिराजी गांधी यांनी आणीबाणीवेळी देशाची संपत्ती विकली नाही, सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या उद्योगपतींच्या घशात घातल्या नाहीत. पण देशात मागील ११ वर्षांपासून अघोषीत आणीबाणी सुरु आहे, विमानतळ, बंदरे, खाणी, बँका, सरकारी जमिनी लाडक्या उद्योगपतीला विकल्या जात आहेत. धारावीची जमीन विकली आहे. देशात आज हुकूमशाही असून भाजपाचा भस्मासूर लोकशाही गिळू पहात आहे.”
भाजप सरकारने बुधवारी आणीबाणी संदर्भात कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करत जाहिरातबाजी केली. सरकारी जाहिरातीतून राजमुद्रा गायब असून सेंगोल दाखवला आहे. सेंगोल कशाचे प्रतिक आहे, हे वेगळे सांगायला नको. भाजपला लोकशाही आणि संविधान संपवून गोलवलकर यांचे ‘बंच ऑफ थॉट’ लागू करायचे आहे,” असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
काँग्रेस पक्षाचे मुख्यपत्र जनमानसाची शिदोरी या मासिकाचा आणीबाणी विशेष अंक काढला आहे. या अंकात इंदिराजी गांधी, पुपुल जयकर, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, दैनिक सामनाचे संपादक व खा. संजय राऊत यांच्यासह अनेक ज्येष्ठ लेखकांनी लेख लिहिले आहेत. या अंकातून आणीबाणी संदर्भातील सत्य लोकांसमोर आणले जाणार असून भाजपच्या खोट्या प्रचाराला चोख उत्तर मिळेल, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांनी विधानसभा निवडणुकीतील मतचोरीसंदर्भात ट्वीट करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात ८ टक्के मतदार वाढले हे आरटीआयमधून उघड झाले आहे. फडणवीसांविरोधात निवडणूक लढलेले काँग्रेस उमेदवार प्रफुल्ल गुडदे पाटील यांनी ही माहिती मागविली आहे. विशिष्ट मोबाईल नंबरवरून अनेक मतदारांची नोंद केल्याचेही स्पष्ट झालेले आहे. याची शहानिशा करावी असे निवडणूक आयोगाने सांगितले पण शहानिशा केलेली नाही. गुडदे पाटील यांनी न्यायालयात दोन याचिकाही दाखल केलेल्या आहेत. फडणवीस यांनी या सर्व प्रश्नांची उत्तरे दिलेला नाहीत. या मतचोरीची उच्चस्तरीय चौकशी करावी व चौकशी होईपर्यंत त्यांनी पदावरून दूर रहावे असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
संसद आणि विधिमंडळ अंदाज समितीतील लोकांनी पाच हजार रुपयांचे शाही भोजन, 550 रुपये भाड्याच्या चांदीच्या ताटात पाहुणचार झोडला तो धुळे विश्रामगृहातील खोली क्रमांक 102 मध्ये सापडलेल्या अंदाज समितीच्या पैशातून होता का, असा प्रश्न विचारून अंदाज समितीच्या तमाशाचा हा दुसरा वग आहे. शाही पाहुणचार झोडून काटकसर कशी करायची, हे समितीने सांगितले असावे. शेतक-यांना कर्जमाफी द्यायला, लाडक्या बहिणीला 2100 रुपये देण्यास पैसे नाहीत आणि मेजवाणी झोडण्यासाठी मात्र पैसे आहेत, असेही सपकाळ म्हणाले.