‘ॲक्झिओम स्पेस’ या खासगी अवकाश संस्थेच्या ‘ॲक्झिओम-४’ या व्यावसायिक मोहिमेला बुधवारपासून सुरुवात झाली. फ्लोरिडा येथील केनेडी अवकाश केंद्राच्या उड्डाण तळावरून ‘स्पेसएक्स’च्या ‘ड्रॅगन’ यानाचे प्रक्षेपण झाले. काय आहे ‘अॅक्झिओम-४’ मोहीम...
संयुक्त उपक्रमनासा, युरोपियन स्पेस एजन्सी आणि इस्रो या दिग्गज अंतराळ संशोधन संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबवली जात आहे. इस्रो व नासाने केलेल्या संयुक्त कराराअंतर्गत आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात अंतराळवीर पाठवण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या करारानंतरच्या पहिल्या मोहिमेअंतर्गत शुभांशु शुक्ला अवकाशात झेपावले आहेत. मोहिमेत सहभागी असलेले सर्वजण अवकाशात १४ दिवस राहणार आहेत.
नेतृत्व कोणाचे?मोहिमेचे नेतृत्व कमांडर पॅगी व्हिटसन या करीत असून, अंतराळवीर शुभांशु शुक्ला पायलट असतील. हंगेरीचा अंतराळीवर टिबोर कपू आणि पोलंडचा स्लोव्होज उझ्नान्स्की विस्निव्हस्की तज्ज्ञ म्हणून सोबत गेले आहेत. शुक्ला हे भारताच्या आगामी ‘गगनयान’ मोहिमेतही सहभागी होणार असल्याने या मोहिमेचा त्यांना नक्की फायदा होणार आहे. १९८४ मध्ये भारताचे अंतराळवीर विंग कमांडर राकेश शर्मा हे सोव्हियत संघ मिशनसोबत अंतराळात गेले होते. ॲक्सिओम-४ च्या माध्यमातून आता दुसरा भारतीय व्यक्ती अंतराळात झेपावला आहे.
Hadapsar Artist Palkhi Painting : पालखीच्या रथावर सजले संतांचे चित्ररूप; चित्रकार विशाल केदारी यांच्या चित्राला रथाच्या शिरोभागी मानमोहिमेची उद्दिष्टे...
‘ॲक्झिओम-४’ ही व्यावसायिक मोहीम आहे. त्यामध्ये अंदाजे ६० वैज्ञानिक प्रयोग केले जातील. हे प्रयोग जगभरातील ३१ देशांनी दिले आहेत.
या मोहिमेसाठी भारताने ५५० कोटी रुपयांचा खर्च केला आहे. ‘रिअलाइझ द रिर्टन’ असे या मोहिमेचे ब्रीदवाक्य आहे.
सूक्ष्म गुरुत्वाकर्षणावर अवकाशात वनस्पती कशा वाढतात, यांसारख्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला जाईल. या वनस्पतींमध्ये कोणते गुणधर्म असतील, हेदेखील जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाईल.
टार्डीग्रेड या सूक्ष्म जलचराची अवकाशात वाढ करून त्याच्यावर अवकाशातील विविध घटकांचा होणारा परिणाम अभ्यासला जाईल.
सात प्रकारच्या बियाणांवर, कडधान्यांवर सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाचा परिणाम अभ्यासला जाईल. बियाणे, कडधान्ये जमिनीवर आणल्यानंतर त्याचे जनुकीय विश्लेषण करणे हे मोहिमेचे उद्दिष्ट आहे.
सायनोबॅक्टेरिया हे जलचर जिवाणू आणि सूक्ष्मशैवालांच्या प्रजाती सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात पाठवून त्याचा तुलनात्मक अभ्यास केला जाईल.
सन २०३५ पर्यंत भारत स्वतःचे अंतराळ स्थानक विकसित करणार आहे. आगामी काळात गगनयान, चांद्रयान आदी विविध मोहिमा इस्रो राबवणार आहे. खासगी मोहिमेच्या निमित्ताने भारतीय व्यक्ती अंतराळात पाठवणे हे इस्रोच्या आगामी १५ वर्षांतील टप्प्यातील महत्त्वाचा टप्पा आहे. या मोहिमेतील अनुभवाचा भारताला नक्की फायदाच होणार आहे.
- पल्लव बागला, विज्ञान-तंत्रज्ञान विषयातील अभ्यासक (‘बीबीसी’ला दिलेल्या मुलाखतीत)