बालगंधर्व परिवार ट्रस्टच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिरांच्या ५७ व्या वर्धापन दिनानिमित आयोजित दुसऱ्या दिवशी 'आज स्त्री कितपत सुरक्षित आणि सबल - मुक्त असो की उंबऱ्या आड' या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्रात समाजसेविका अंजली दमानिया, अभिनेत्री दीपाली सय्यद आणि भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई सहभागी झाल्या होत्या, त्यांच्याशी निवेदक नम्रता वागळे यांनी संवाद साधला. या चर्चासत्रात वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणा पासून धनंजय मुंडे लग्न प्रकरणा पर्यंत अनेक प्रकरणावर चर्चा झाली.यावेळी बालगंधर्व परिवार ट्रस्ट चे अध्यक्ष मेघराज राजेभोसले आणि मान्यवर उपस्थित होते.
अंजली दमानिया म्हणाल्या, प्रत्येक घरात मुलीला स्वयंपाक शिकवला जातो तर मुलाला अभ्यास करायला सांगितला जातो. खर तर तिथेच आपली मानसिकता बदलायला हवी. मुलगी मुलांपेक्षा कुठेही कमी नाही हे आधी समजून घेणे गरजेचे आहे. हे घरातील महिलांनी सर्वात आधी स्वीकारायला हवा. दोघांनाही उत्तम शिक्षण देवून मुलींना स्वतःच्या पायावर उभ केल तर मुलींचे सोशन कमी होईल.
तृप्ती देसाई म्हणाल्या, महिला सबलिकरणांकडे जाताना निर्णय घेणाऱ्या सुद्धा महिलाच असणे आवश्यक आहे. दुर्दैवाने जेव्हा महिला - महिलांनाच विरोध करतात तेव्हा त्यांचे निर्णय घेणारे पुरूष असतात. त्यामुळे महिलांना न्याय मिळतच नाही. पोलिसांमध्ये गेल्यावर सुद्धा त्यांना दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत पोलिस स्टेशनमध्ये थांबवल जातं. त्यामुळे महिला पोलीसातही जात नाहीत. त्यामुळे जेव्हा जेव्हा महिलांवर अत्याचार होत असेल तेव्हा महिलांनी एकत्र उभ राहिलं पाहिजे आणि आपली ताईगिरी दाखवली पाहिजे.
दीपाली सय्यद म्हणाल्या, महिलांना नेहमीच दुय्यम स्थान मिळत आल आहे. तसेच प्रत्येक क्षेत्रात त्यांना असुरक्षितता भेडसावत असतेच. पण त्यांना सुरक्षित वातावरण निर्माण करून देण्याची जबाबदारी त्यांच्या आसपासच्या लोकांची आहे. तसेच त्यांना आहे तस स्वीकारण देखील गरजेच आहे. मुलींना वाढत्या वयातच महिलां विषयक कायद्याचे ज्ञान दिल्यास मुली सजग होतील व सुरक्षित फील करतील.