पहिली फेब्रुवारीमध्ये आणि दुसरी मेमध्ये होणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) दहावी बोर्ड परीक्षा वर्षातून दोनदा घेण्याच्या निकषांना मान्यता दिली आहे. 2026 पासून दहावी बोर्ड परीक्षा सीबीएसईकडून वर्षातून दोनदा घेतल्या जातील. वर्षातील पहिली परीक्षा फेब्रुवारीमध्ये आणि दुसरी परीक्षा मेमध्ये घेतली जाईल. फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या परीक्षेचे निकाल एप्रिलमध्ये जाहीर केले जातील आणि मेमध्ये होणाऱ्या परीक्षेचे निकाल जूनमध्ये जाहीर केले जातील.
सीबीएसईने दोनदा परीक्षा घेण्याच्या मॉडेलला मान्यता दिल्याची माहिती बुधवारी सीबीएसई परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांनी दिली. विद्यार्थ्यांवरील दबाव कमी करणे आणि त्यांना चांगल्या कामगिरीसाठी दुसरी संधी देणे हा त्याचा उद्देश आहे. दहावी बोर्ड परीक्षेतील विद्यार्थ्यांना पहिल्या परीक्षेत बसणे बंधनकारक असेल आणि दुसऱ्या बोर्ड परीक्षेत मर्जीने (ऐच्छिक) सहभागी होता येईल. विद्यार्थी आपल्या गुणांमध्ये सुधारणा करण्यासाठी दुसऱ्यांदा सहभागी होऊ शकतात. म्हणजेच, जर एखाद्या विद्यार्थ्याला त्याच्या पहिल्या प्रयत्नातील गुणांवर समाधान नसेल, तर तो दुसऱ्या परीक्षेला बसू शकतो. नवीन नियमांनुसार अंतर्गत मूल्यांकन वर्षातून एकदाच केले जाईल.
कोणते गुण अंतिम मानले जातील?
जर एखादा विद्यार्थी वर्षाच्या दोन्ही परीक्षांमध्ये बसला तर त्याचे जे गुण जास्त असतील ते अंतिम मानले जातील. जर एखाद्याला पहिल्या परीक्षेत जास्त गुण मिळाले आणि दुसऱ्या परीक्षेत कमी गुण मिळाले, तर त्याच्या पहिल्या टप्प्यातील परीक्षेचे गुण अंतिम मानले जाऊ शकतात.
नवीन शिक्षण धोरणाला अनुसरून निर्णय
नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी 2020) च्या शिफारशींच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या चुकांमधून शिकता यावे आणि सुधारणा करता याव्यात यासाठी त्यांना लवचिक आणि तणावमुक्त वातावरण प्रदान करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. एकाच परीक्षेतून विद्यार्थ्याच्या प्रतिभेचे पूर्णपणे मूल्यांकन करता येत नाही, असे सीबीएसईने म्हटले आहे.
परीक्षा कधी होणार?
– सीबीएसईने फेब्रुवारीमध्ये तयार केलेल्या मसुद्यानुसार, पहिला टप्पा साधारणपणे 17 फेब्रुवारी ते 6 मार्च दरम्यान घेता येईल आणि दुसऱ्या टप्प्याच्या परीक्षा 5 ते 20 मे दरम्यान घेतल्या जातील.
– पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याच्या परीक्षांमध्ये अभ्यासक्रम समान असेल आणि संपूर्ण अभ्यासक्रम समाविष्ट केला जाईल. यासोबतच, दोन्ही परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र समान असतील.
– जर आपण परीक्षा शुल्काबद्दल बोललो तर, दोन्ही परीक्षांचे शुल्क नोंदणीच्या वेळीच जमा करावे लागेल. पहिल्या परीक्षेनंतर आपला निकाल सुधारायचा असल्यास दुसऱ्या परीक्षेद्वारे विद्यार्थी संधी घेऊ शकतात.