लीड्स कसोटी सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियावर चोहू बाजूने टीका होत आहे. कारण खोऱ्याने धावा करूनही कमकुवत गोलंदाजी आणि सुमार क्षेत्ररक्षणाचा फटका टीम इंडियाला बसला. भारताने जिंकणारा सामना आपल्याच चुकांमुळे गमावला असं दिग्गज क्रिकेटपटूंचं म्हणणं आहे. असं असताना माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने एक वेगळाच मुद्दा उपस्थित केला आहे. आकाश चोप्राने युट्यूब चॅनेलवर जसप्रीत बुमराहबाबत एक प्रश्न उपस्थित केला. त्यामुळे क्रीडाप्रेमींना विचार करण्यासाठी आणखी एक अँगल मिळाला आहे. जसप्रीत बुमराहची रणनिती आधीच उघड केल्याने इंग्लंडला कुठे ना कुठे फायदा होत असल्याचं त्याने सांगितलं. जसप्रीत बुमराह फक्त तीन कसोटी सामने खेळणार हे जगाला ओरडून सांगण्याची गरज नव्हती असं आकाश चोप्राने सांगितलं आहे.
आकाश चोप्राने सांगितलं की, ‘बुमराहने एका मुलाखतीत सांगितलं की तो फक्त तीन सामने खेळणार आहे. आता मला असं वाटते की हे सार्वजनिक करण्याची खरंच गरज होती का? हे गुपित का ठेवलं गेलं नाही. आम्ही आपल्या प्लेइंगल इलेव्हनची घोषणा कधीच करत नाहीत. त्यामुळे ही मालिका सुरु होण्यापूर्वी हे वारंवार सांगण्याची काय गरज होती की बुमराह फक्त तीन सामने खेळणार?’ जर बुमराह एजबेस्टनमध्ये दुसरा कसोटी सामना खेळला तर शेवटच्या तीन पैकी एका सामन्यात खेळेल आता हे निश्चित झालं आहे. त्यामुळे इंग्लंडला मालिकेतील इतर सामन्यांसाठी खेळपट्टी तयारी करण्याची संधी मिळेल. आकाश चोप्राने मांडलेला मुद्दा क्रीडाप्रेमींच्या डोक्यात प्रकाश टाकणारा ठरला आहे. कारण यामुळे इंग्लंडला फायदा होऊ शकतो.
दुसरीकडे, आकाश चोप्राने गोलंदाजांची नवी पिढी तयार करण्याची आवश्यकता असल्याचं म्हंटलं आहे. ‘भारतीय वेगवान गोलंदाजांची पुढची पिढी तयार करावी लागणार आहे. हा एक गंभीर मुद्दा आहे. विदेशात कसोटी जिंकण्यासाठी 20 विकेट घेण्याची गरज आहे. मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह योग्य आहेत. मोहम्मद शमी अजूनही खेळत आहे, पण करिअरच्या शेवटच्या टप्प्यात आहे. मोहम्मद सिराज ठीक आहे. पण बुमराह आणि शमीची पातळी गाठणं कठीण आहे.’