मुंबई : राज्य सरकारने त्रिभाषा सूत्र लागू करत सर्व शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी सक्ती केली आहे. पण राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात आता सर्वच विरोधातील राजकीय पक्ष, नेतेमंडळी आणि शिक्षक संघटना एकत्र आल्या आहेत. हिंदी सक्तीला विरोध करणारे आणि हिंदी सक्तीविरोधात आंदोलन उभे करणारे मराठी अभ्यास केंद्राचे प्रमुख डॉ. दीपक पवार यांनी आज गुरुवारी (ता. 26 जून) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. ज्यानंतर उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेत भाजपाच्या भाषिक आणीबाणीला विरोध करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. (Uddhav Thackeray clarifies his stance opposing BJP linguistic emergency)
मराठी अभ्यास केंद्राचे प्रमुख डॉ. दीपक पवार यांनी आज गुरुवारी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यानंतर उद्धव ठाकरे आणि दीपक पवार यांनी पत्रकार परिषद घेत प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी सुरुवातीला दीपक पवार प्रसार माध्यमांसमोर म्हणाले की, आम्ही उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी संजय राऊत, विनायक राऊत हजर होते. हिंदीसक्तीचा विरोध आम्ही त्यांच्यासमोर मांडला. कोणत्याही परिस्थितीत हिंदीची सक्ती होऊ देणार नाही. 19 जूनला जाहीर सभा घेणार असून हिंदी सक्तीच्या निर्णयाची प्रतिकात्मक होळी करणार असल्याचे दीपक पवार म्हणाले. या कार्यक्रमात उद्धव ठाकरे येणार आहेत. 7 जूलै रोजी हुतात्म्यांना अभिवादन करून आंदोलन केले जाणार आहेत. विधिमंडळातील सर्व आयुध वापरुन ठाकरेंचा पक्ष मदत करेल. सांस्कृतिक कारस्थानाच हत्यार म्हणून वापरल जात असेल तर याचा आम्हाला विरोध आहे. आम्ही कॉंग्रेसच्या नेत्यांना भेटलो. दादा भुसे सादरीकरण करणार आहेत. त्या समोर आम्हीदेखील प्रतिसादरीकरण करू. ठाकरेंचा पक्ष आमच्या सोबत असेल तर या आयएएम लॉबीला रोखण्यास यश येईल, दीपक पवार म्हणाले.
हेही वाचा… Raj Thackeray on Hindi : तिसऱ्या भाषेमागचा तर्क विचारत राज ठाकरेंनी दादा भूसेंचे शिक्षणच काढले
यानंतप उद्धव ठाकरेंनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत म्हटले की, कारण नसताना हिंदी सक्तीचा निर्णय महाराष्ट्रद्रोही सरकारने लादला आहे. यासाठी सर्व पक्ष एकत्र येत आहेत. यांना महाराष्ट्रावर यांची हुकूमशाही लादायची आहे आणि म्हणूनच यांना शिवसेना संपवायची आहे. आम्ही कोणत्या भाषेच्या विरोधात नाही, पण जोपर्यंत ही सक्ती मागे घेतली जाणार नाही तोपर्यंत आंदोलन होईल. मी माझ्या राज्यात हिंदी सक्ती होऊ देणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले तर हा विषय इथे संपेल. पण बटेंगे तो काटेंगे करून विषाचा खडा टाकला जात आहे. हिंदीला आमचा विरोध नाही. हिंदी सक्तीला आमचा विरोध आहे. हिंदी चित्रपट सृष्टीला महाराष्ट्राने जोपासले. अनेक कलाकार मुंबईत आले आणि मोठे झाले. आम्हाला हिंदीचं वावडे नाही पण एक विधान, एक प्रधान हे सर्व एकाधिकारशाहीकडे वाटचाल सुरू आहे. त्यामुळे आता ही भाषिक आणीबाणी लादली जात असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंकडून करण्यात आला आहे.