पिरंगुट : पुण्यातील येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्या वतीने संविधान दिंडी निघाली आहे. त्यासाठी वारीमध्ये आळंदी ते पंढरपूर संविधान रथ काढण्यात आला असून श्रद्धा आणि भक्तीबरोबरच सर्वसामान्य जनतेपर्यंत भारतीय संविधानातील हक्क, अधिकार आणि कर्तव्यांचीही ओळख व्हावी आणि त्यांनी राष्ट्राप्रती असलेले कर्तव्य करावे या उद्देशाने हा उपक्रम राबविला आहे.
बार्टी ही सामाजिक न्याय विभागाची स्वायत्त संस्था आहे. या संस्थेमध्ये समाज कल्याणच्या ज्या शैक्षणिक तसेच आर्थिक योजनांचा लाभ विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना दिला जातो त्या योजनांची माहिती या संविधान दिंडीमार्फत सर्वांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांच्या मार्गदर्शनाखाली वारकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. भारतीय राज्यघटनेचे महत्त्व, देशाचे सार्वभौमत्व त्यात पटवून दिले जाते. थोर संत समाज सुधारक शाहू, फुले, आंबेडकर यांच्या प्रबोधनाचा तसेच प्रास्ताविकेचे वाचन करून आणि पथनाट्य, प्रश्नमंजूषा आदींद्वारे वारकऱ्यांना संविधानाचे महत्त्व समजावून दिले जात आहे. या दिंडीत संगीता शहाडे, प्रशांत कुलकर्णी तसेच त्यांचे सहकारी समतादूत यांच्याद्वारे आळंदी ते पंढरपूरपर्यंत संविधानाचा जागर करीत आहेत.