Bhaskar jadhav : भास्कर जाधव नाराज? चर्चा जाधवांच्या स्टेटसची, इशारा कोणाला; पक्ष नेतृत्वाला आव्हान
esakal June 26, 2025 07:45 PM

Bhaskar Jadhav : गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी सोशल मीडियावर ठेवलेल्या स्टेटसची राजकीय क्षेत्रात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या स्टेटस मधून त्यांनी पक्ष नेतृत्वाला आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच वेळ गेल्यानंतर माणसाची किंमत करण्यात काहीच अर्थ नाही असा सल्लाही दिला आहे. त्यांचा दुसरा सल्ला नक्की कोणासाठी आहे हे समजायला मार्ग नाही त्यामुळे त्याची चर्चा सुरू असून अनेक तर्कवितर्क काढले जात आहेत.

कोकणातील ठाकरे गटाच्या शिवसेनेचे एकमेव आमदार भास्कर जाधव पक्षात नाराज असल्याची चर्चा मागील काही दिवसापासून सुरू आहे. आपल्या कृतीतून त्यांनी तशी वातावरण निर्मिती केली आहे प्रसिद्धी माध्यमाना मी अजिबात नाराज नाही असे ते वारंवार सांगत असले तरी कार्यकर्त्यांचा मेळावा त्यात पक्षातील नेत्यांच्या कार्यपद्धतीवर टीका करणे, मला पक्षात कसे डावलले जात आहे हे कार्यकर्त्यांना माहीत करून देण्याचे काम ते करत आहेत. त्यामुळे त्यांच्या कृतीतून स्पष्टपणे नाराजी जाणवत आहे.

Shivsena UBT: राजकारणातून निवृत्ती? bhaskar jadhav बघा काय म्हणाले? | Sakal News

आज त्यांनी व्हॉट्स ॲपवर ठेवलेल्या दोन स्टेटस ची राजकीय क्षेत्रात खूप चर्चा सुरू झाली आहे. पक्षातील नेते कार्यकर्ते पक्ष सोडून जात आहे. घर रिकामे होत असताना ते कसे समजत नाही. सर्व काही एकत्र आहे तरी शून्यतेची भावना आहे. आजकाल नात्यांमध्ये एक प्रकारचा दिखावा केला जातो. असा त्यानी पहिला स्टेटस ठेवले आहे.

दुसऱ्या स्टेटस मध्ये दिवा जळत असताना तुपाची गरज असते. तो विझल्यानंतर तूप ओतणे निरर्थक आहे. एखाद्याचे वेळेवर कौतुक करा वेळ निघून गेल्यानंतर कौतुक करणे निरुपयोगाचे आहे. पक्षाने वेळीच त्यांचा सन्मान केला तर ठाकरेंच्या पक्षाला चांगले दिवस येतील असे त्यांना म्हणायचे आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.