Raj Thackeray on hindi compulsion after meeting with Dada Bhuse
Marathi June 26, 2025 08:24 PM


मुंबई : राज्यात राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार त्रिभाषा सूत्र लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला. याविरोधात अनेक पक्षांनी विरोध दर्शवला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोठी घोषणा केली. हिंदीसक्तीविरोधात राज ठाकरे यांनी 6 जुलैला सरकारच्या निर्णयाविरोधात मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली. यावेळी त्यांनी सर्वपक्षीय नेत्यांना तसेच हिंदीसक्तीचा विरोध करणाऱ्या सर्व संघटनांना या मोर्च्यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. “यावेळी कोणत्याही पक्षाचा झेंडा नसेल. 6 जुलैला रविवार असून अनेक पालक आणि विद्यार्थ्यांना यामध्ये सहभागी होण्यास सोपे पडेल. तसेच हा मोर्चा गिरगाव चौपाटीवरून सकाळी 10 वाजता निघेल,” असे स्पष्ट केले. (Raj Thackeray on hindi compulsion after meeting with Dada Bhuse)

हेही वाचा : Raj Thackeray on Hindi : तिसऱ्या भाषेमागचा तर्क विचारत राज ठाकरेंनी दादा भूसेंचे शिक्षणच काढले 

शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी गुरुवारी (26 जून) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेत मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधला. “महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री आता येऊन गेले त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. मी पूर्णपणे भूमिका फेटाळून लावली असून आम्हाला हे मान्य नसल्याचे सांगितले. खरतर पाचवी नंतरच पर्यायी भाषेचा मुद्दा आहे, त्यांना हेही सांगितले की राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये असे काही नाही हे राज्यांवर टाकले आहे, मग ते का करत नाहीत,” असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. तर, “सीबीएसई या शाळा आल्या त्या आयएएस अधिकाऱ्यांसाठी काढण्यात आल्या आहेत. त्या शाळेचे वर्चस्व करण्याचे सुरू आहे आणि महाराष्ट्र हे का करत आहे? बाकी राज्य काही अशी भूमिका घेत नाही. आमचा या संपूर्ण प्रकरणाला विरोध आहे, असेल आणि राहणार आहे.” असे राज ठाकरेंनी स्पष्ट केले.

“हिंदी असेल किंवा इतर कोणत्या ही भाषेची सक्ती राहणार नाही. मी सर्व पक्षांना आवाहन करत आहे की, येत्या 6 जुलैला आम्ही गिरगाववरून मोर्चा काढणार आहोत. या मोर्चात कोणताही झेंडा नसेल, हा मराठी माणसाचा मोर्चा असेल, आम्ही सर्वांना या मोर्चाचे आमंत्रण देत आहोत. मी बाकीच्या पक्षासोबत बोलणार आहे,” अशी घोषणाच राज ठाकरेंनी केली. तसेच, “महाराष्ट्राचे मराठीपण घालवायचा हा कट आहे, मी कट बोलतो कारण हा कटच आहे,” असेही राज ठाकरेंनी म्हटले. या मोर्चात कोणताही झेंडा नसेल. सर्व साहित्यिक, मराठी प्रेमी, सर्वपक्षीयांनी या मोर्चात सहभागी व्हावे. कारण, या मोर्चात कोणताही झेंडा नसेल तर मराठीचा अजेंडा असेल.” असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.



Source link

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.