पहिल्या पावसाचे पाणी मातीवर पडल्यावर येणाऱ्या सुगंधाने मन मोहित होणार नाही अशी व्यक्ती मिळणे अशक्य. पृथ्वीचा जो ममत्वाचा व मुख्य गुण ‘गंध’, त्याची उत्तेजना आकाशतत्त्वातून येणाऱ्या पाण्याच्या मिलनामुळे होते आणि या सर्जनाचा गंध सर्व सृष्टीला व्यापून टाकतो. मात्र एरवी कोरड्या मातीवर पाणी शिंपडून असा गंध येत नाही.
‘गंध’पृथ्वीतत्त्वाचा किंवा त्या ठिकाणी असणाऱ्या वास्तव्याचा निदर्शक असतो. आपली जडसृष्टी व आपली सर्व इंद्रिये एका विशिष्ट तरंगलांबीच्या क्षेत्रात काम करतात. वैश्र्विक शक्ती रूपांतरित होऊन पंचमहाभूतात परिवर्तित होते. खालच्या पातळीवर पृथ्वीतत्त्व व जलतत्त्व प्राधान्याने दिसतात. आपण ज्या पृथ्वीवर राहतो तेथेही दोन तृतीयांश पाणी आहे.
या दोन महाभूतात असणाऱ्या गुणवत्तेची समज ज्याने होते, तो ‘गंध’! निसर्गचक्राच्या नियमाप्रमाणे पृथ्वीवर वनस्पती उगवतात. वनस्पतीला फुले व फळे येऊन पुन्हा वैश्र्विक शक्तीत परिवर्तन होते. कुठल्याही वनस्पतीचे वा द्रव्याचे सूक्ष्म शक्तीत रूपांतरण होत गेले की त्याचा बोध होतो गंधामुळे. म्हणूनच
वनस्पतिरसोद्भूतो गन्धाढ्यो गन्धः उत्तमः ।
आघ्रेय सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यताम् ॥
या श्र्लोकामध्ये देवतांचे आवाहन करण्यासाठी धूप अर्पण करण्यात येतो असे म्हटले आहे.
वनस्पतीचा जो धूर आहे, त्याच्यातून निघणारी जी वाफ आहे, जो किरणोत्सार आहे तेथून पुन्हा सूक्ष्मत्वाला म्हणजे देवत्वाला सुरुवात होते व ती शक्ती पुन्हा देवत्वात, मर्मतत्त्वात विलीन होते. त्यामुळे आपल्याला गंधावरून त्या त्या शक्तीचे ज्ञान होते व प्रत्येक वस्तूचा गंध वेगळा असतो. एखाद्या खोलीत गेल्यावर तेथे येणाऱ्या वासावरून तेथे कोणाचा ‘वास’ होता हे आपल्याला समजू शकते.
एखाद्या व्यक्तीने नेहमी विशिष्ट अत्तर लावायची सवय ठेवली की नुसत्या वासावरून त्या व्यक्तीचे अस्तित्व आपल्याला जाणवते. प्रत्येक वस्तूचा किंबहुना प्रत्येक व्यक्तीचा एक गंध असतो. शारीरिक व मानसिक शुद्धता नसल्यास तो दुर्गंधही होऊ शकतो. असा वास जर नकोसा वाटला तर त्या व्यक्तीचा सह-वासही आपल्याला नकोसा वाटतो.
गंधचिकित्सा ही अतिशय सूक्ष्म चिकित्सापद्धती आहे. विशिष्ट शक्तीचा उपयोग करून घेण्यासाठी व त्या शक्तीचे आवाहन करण्यासाठी गंधचिकित्सा उपयोगी पडते. जी द्रव्ये शरीरात किंवा मनात स्थूल रूपाने पोचू शकत नाहीत, त्यांचा गंध पोचवण्याने काम होऊ शकते. जेथे जेथे गंध तेथे तेथे अत्यंत सूक्ष्म रूपाने का होईना, अणूंचे वास्तव्य असतेच.
म्हणून ज्यावेळी घरात कुजल्याचा वा मलमूत्राचा वास येतो तेव्हा दारे, खिडक्या उघड्या करून सर्व जडाचे गंधकण घराबाहेर जाऊन घरातली हवा शुद्ध करणे आवश्यक असते. नुसता अत्तराचा फवारा मारून उपयोग होत नाही कारण अशुद्ध जंतूकणांना नुसते नाक बंद करून किंवा सुवासाने झाकून टाकून उपयोग नसतो.
मेंदूला वासांच्या संवेदना उत्तम रीतीने कळतात. चवीपूर्वी येणारा अन्नाचा वास महत्त्वाचा असतो. अन्न पाहिल्यावर प्रथम मेंदूला त्याच्या वासाचे ज्ञान होते व ती वस्तू शरीरात स्वीकारण्याची व्यवस्था होते.
गंधचिकित्सेमध्ये सर्वप्रथम लक्षात घ्यायची गोष्ट म्हणजे स्वच्छता. स्वच्छता असेल तेथेच समृद्धी व लक्ष्मीचा वास असतो.
घरात कुठल्याही प्रकारचा दुष्ट वास नसणे, सर्व स्वच्छ असणे फार महत्त्वाचे आहे. श्रीरामचंद्रांनी वनवासातल्या काळात वनात कुटी बांधायचे ठरवले तेव्हा जागा निवडली व लक्ष्मणाला सांगितले, “येथे सर्व स्वच्छ, नैसर्गिक आहे, येथे पूर्वी कुणीही ‘वास’ केलेला नाही, तेव्हा येथे आपल्या वास्तव्यासाठी कुटी उभारू.'
मनावर परिणाम मिळवायचे असतील, रोगनिवारण करायचे असेल तेव्हा आवश्यकतेप्रमाणे वेगवेगळ्या वासांचे उपयोग करता येतात. यासाठी निसर्गात प्रकट होणारे वनस्पतिज वास सर्वांत महत्त्वाचे. चंदन, गुलाब, चाफा, मोगरा हे सर्वच वास मनमोहित करणारे असले तरी त्याचे उपयोग वेगवेगळे असतात. त्यांचा विचार करताना त्यांचे वात-पित्त-कफ वगैरे गुण विचारात घेतलेले असतात.
त्याचा शरीराच्या अवयवांवर व मनावर होणाऱ्या परिणामांचा विचार केलेला असतो व यातूनच तयार होते ‘गंधचिकित्साशास्त्र’ (ॲरोमा थेरपी). सध्या संपूर्ण आयुर्वेदिक पद्धतीवर आधारलेली अत्तरे व शुद्ध वनस्पती धूप वापरून करायची गंधचिकित्सा न वापरता स्वस्त गवताची तेले वगैरे वापरण्याकडे कल वाढत आहे. शुद्ध रत्न न मिळाल्यास साधे कमी किंमतीचे रंगीत खडे वापरण्यासारखाच हा प्रकार आहे. इलाज करताना व्यक्तीची प्रकृती व द्रव्याची प्रकृती यांचा मेळ समजणे आवश्यक असते.
सकाळी व संध्याकाळी घरात, मंदिरात, मशिदीत, चर्चमध्ये धूप करून सर्व तऱ्हेच्या व्हायरस व दुष्ट शक्तींचा नाश करण्याची पद्धत फार प्राचीन आहे. जगभर, सर्व धर्मांच्या सर्व प्रार्थनास्थळात आणि शारीरिक व मानसिक रोग निवारण्यास, धूमचिकित्सेचा उपयोग केलेला असतो. नवजात बाळाला व आईला आणि विशेषतः सर्व स्त्रीरोगात धूमचिकित्सेचा खूपच उपयोग होतो. यज्ञसंकल्पना ही एक सर्वांत मोठी व्यक्तिगत व सामाजिक सर्वंकष आरोग्यासाठी गंधचिकित्सा आहे.
यज्ञ संकल्पनेत वनस्पतींचे पंचांग अग्नीवर टाकून धूर करणे ही सर्वात पारंपरिक, सुरक्षित गंधचिकित्सा आहे. पण त्यात काटछाट करत करत व वापरायला सुटसुटीत होण्यासाठी बनवलेली उदबत्ती मात्र सध्या विकृत अवस्थेत जाऊन पोचली आहे. सध्या त्यात घातले जाणारे वास कृत्रिम द्रव्याांसून तयार केलेले असतात. एखादा वास जरी गुलाबासारखा वाटला तरी त्यामागे असलेले सूक्ष्म अणू मात्र अशुद्ध द्रव्यांचेच असतात, जणू शूर्पणखेने एखाद्या सुंदर युवतीचे रूप घेऊन मोहिनी पाडावी व नंतर मात्र प्रकट झाल्यावर कळावे की ती एक राक्षसीच आहे.
अशाच तऱ्हेने हे कृत्रिम गंध काम करतात व त्यामुळे अनेकांना खाज सुटणे, श्र्वासाला त्रास होणे, पचन बिघडणे, धडधडणे, जीव कोंदणे वगैरे त्रास होऊ शकतात. पण जर उदबत्ती वनस्पतीचा लगदा करून बनवलेली असेल किंवा शुद्ध तेलात बुडवून केलेली असेल, तर ती देवासाठी, वापरणाऱ्या व्यक्तीच्या आरोग्यासाठी व गंधचिकित्सेसाठी पण चांगली.
वास सूक्ष्म द्रव्यांचा असल्याने फार कमी वेळ टिकतो, लवकर विरून जातो. तोच वास अधिक वेळ टिकून राहण्याच्या अपेक्षेने जर त्यात अनैसर्गिक द्रव्ये टाकली तर मात्र त्रास होऊ शकतो.
अजिबात धूर नको असणाऱ्यांना, गरम पाण्यात दोन थेंब अत्तर टाकून तयार झालेल्या वाफेचाही गंधचिकित्सा म्हणून उपयोग होतो. पण येथेही वापरायची तेले कृत्रिम सुगंधाची नसावी.
आयुर्वेदोक्त पंचकर्मातील पूर्वकर्माच्या वेळी, बदाम तेल, चंदन तेल, निलगिरी तेल, गुलाब तेल वगैरे द्रव्ये टाकून केलेल्या बाष्पस्वेदनाचा खूप मोठा उपयोग होऊ शकतो. कानामागे किंवा हातावर ज्या ठिकाणी कोमल त्वचेचा तेल द्रव्यांशी लगेच संबंध येईल अशा ठिकाणी अत्तर लावण्याची पद्धत आहे.
घरी आलेल्या पाहुण्याचे गुलाबपाणी शिंपडून स्वागत करण्याची पद्धतही प्राचीन गंधचिकित्साच आहे. विशिष्ट देवतांना विशिष्ट वास आवडतात म्हणजे त्या त्या शक्तीचे आवाहन त्या गंधाने होत असल्यामुळे देवतेचे आवाहन करताना वेगवेगळे गंध वापरले जातात.
(श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या लेखन, व्याख्यानांतून संतुलन आयुर्वेदद्वारा संकलित)