भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना पूर्णपणे भारताच्या पारड्यात झुकलेला होता. चौथ्या दिवसापर्यंत तरी असंच चित्र होतं. कारण इंग्लंडला पाचव्या दिवशी विजयासाठी 350 धावांचं आव्हान हवं होतं. पण पाचव्या दिवशी इंग्लंडच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना विकेटसाठी झुजवलं आणि पाच विकेटने सामना जिंकला. खरं तर हा सामना गमवल्याने क्रीडाप्रेमींनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. इतक्या धावा करूनही सामना जिंकता येत नसेल तर मालिकेत खरंच खूप कठीण झालं आहे. या सामन्याच्या पराभवाचं संपूर्ण खापर हे गोलंदाजांवर फुटलं आहे. जसप्रीत बुमराह सोडला तर एकही गोलंदाज प्रभावी ठरला नाही. त्यामुळे दुसर्या कसोटी सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मध्ये बदल केलं जाण्याची शक्यता आहे. संघात दोन बदल केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे. वर्कलोड मॅनेजमेंटमुळे जसप्रीत बुमराहला आराम दिला जाण्याची शक्यता आहे.
जसप्रीत बुमराहच्या जागी संघात अर्शदीप सिंग किंवा आकाशदीपला संधी मिळण्याची शक्यता आहे. तर या सामन्यात शार्दुल ठाकुरला बाहेरचा रस्ता दाखवला जाण्याची शक्यता आहे. कारण पहिल्या सामन्यात शार्दुल ठाकुर फलंदाजी आणि गोलंदाजीतही फेल गेला होता. त्याने संपूर्ण सामन्यात दोन षटकं टाकली आणि दोन विकेट घेतल्या. पण विकेट घेतल्या तेव्हा सामना हातून गेला होता. तर फलंदाजीतही काही खास करू शकला नाही. दोन्ही डावात एकेरी धावा करून तंबूत परतला. त्याच्या जागी संघात नितीश कुमार रेड्डी किंवा कुलदीप यादवला घेऊ शकते.
दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडियाने जोरदार सराव केला. सरावात कर्णधार शुबमन गिल आणि ऋषभ पंत यांनी भरपूर घाम गाळला. तर बुमराह आणि प्रसिद्ध वगळता इतर गोलंदाजांनी गोलंदाजी केली. बर्मिंघमच्या एजबेस्टनची खेळपट्टी सुरुवातीला फलंदाजांना मदत करणारी असते. तिसऱ्या दिवसापर्यंत बॅटिंगसाठी उत्तम मानलं जातं. तसेच वेगवान गोलंदाजांनाही मदत मिळते. या सामन्यात शेवटच्या दिवशी जोरदार पावसाची शक्यता आहे. या मैदानात आतापर्यंत 60 कसोटी सामने खेळले गेले आहेत. यात पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाने 19 वेळा, तर बॉलिंग करणाऱ्या संघाने 23 सामन्यात विजय मिळवला आहे.