अँडरसन तेंडुलकर कसोटी मालिकेतील पहिला सामना मोठी धावसंख्या करूनही गमवण्याची वेळ आली. यामुळे मालिकेत टीम इंडियाचं काही खरं नाही अशीच भावना क्रीडाप्रेमींमध्ये तयार झाली आहे. भारताने पहिल्या डावात 471 धावा केल्या होत्या. तर दुसऱ्या डावाता 364 धावा केल्या. मात्र इतक्या धावा करूनही गोलंदाजांना काही इंग्लंडला रोखण्यात यश आलं नाही. एकीकडे जसप्रीत बुमराह मेहनत करत होता. मात्र त्याला काही साथ मिळाली नाही. खरं तर मोहम्मद सिराज पूर्णपणे फेल गेल्याचं दिसलं. पूर्ण सामन्यात त्याच्या गोलंदाजीची धार बोथट झाली होती. विकेट मिळाल्या पण धावा देत सुटला. त्याच्या गोलंदाजीतील सूर गेल्याचं दिसून आलं. आता माजी क्रिकेटपटू आर अश्विनने मोहम्मद सिराजवर टीकास्त्र सोडलं आहे. आर अश्विनने त्याची गोलंदाजी पाहून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याबाबतचं मत त्याने स्वत:च्या युट्यूब चॅनेलवर व्यक्त केलं आहे.
आर अश्विनने युट्यूब चॅनेलवर सांगितलं की, माझा एकच प्रश्न आहे. तू धाव गती रोखू शकतो का? तुला विकेट घेण्याची गरज नाही. पण तू प्रत्येक षटकात 4-5 धावा देऊ शकणार नाहीस का? जर धावा जात असतील तर बुमराहला परत गोलंदाजीला आणावं लागतं. बुमराह किती बांध बांधेल? सलग गोलंदाजी करून थकून जातो आणि स्पेल वाढतो. तिथपर्यंत भागीदारी होऊन जाते. एक तर तुम्हाला जडेजासोबत जावं लागेल. त्याला पुढे येऊन धावगती थांबवावी लागेल. प्रसिद्ध पहिल्यांदा खेळत आहे आणि त्याच्याकडे अनुभव नाही. यासाठी सिराजला विश्वासपूर्वक भूमिका बजवावी लागेल. मोर्ने मोर्केल 20 षटकात कशी गोलंदाजी करायचा? अशी भूमिका असली पाहीजे.
मोहम्मद सिराजने पहिल्या डावात 27 षटकं टाकली होती. त्यात 4.51 च्या इकोनॉमी रेटने धावा दिल्या. दोन विकेट मिळाल्या पण तिथपर्यंत इंग्लंडचं टेन्शन रिलीज झालं होतं. दुसऱ्या डावात तर त्याला एकही विकेट मिळाली नाही. 14 षटकात 51 धावा दिल्या. खरं सांगायचं तर पहिल्या सामन्यात जसप्रीत बुमराह सोडला तर एकही गोलंदाज प्रभावी ठरला नाही. प्रसिद्ध कृष्णा आणि शार्दुल ठाकुरही महागडे गोलंदाज ठरले.