मावळात कधी उघडीप तर कधी पावसाच्या धारा
esakal June 28, 2025 12:45 AM

वडगाव मावळ, ता. २७ : मावळ तालुक्यात दोन दिवस पावसाचा जोर ओसरल्यानंतर गुरुवारी दुपारपासून पुन्हा पाऊस सुरू झाल्याने आता उर्वरित पेरण्या होतील की नाही याबाबत शेतकरी वर्गात साशंकता व्यक्त केली जात आहे. शेतीमध्ये वाफसा निर्माण होऊन रखडलेल्या खरीप पिकाच्या पेरण्या काही प्रमाणात तरी होण्यासाठी किमान आठ दिवस चांगल्या उघडिपीची गरज आहे.
मावळ तालुक्यात गेला आठवडाभर मुसळधार पाऊस कोसळला. त्यामुळे नद्या- नाल्यांना पूर येऊन अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. भात खाचरे पाण्याने तुडुंब भरली. त्यामुळे पेरणी केलेल्या काही शेतकऱ्यांची भातरोपे पाण्याखाली गेली. काही शेतकऱ्यांची रोपे जास्त दिवस पाण्याखाली राहिल्याने सडून गेली तर काही शेतकऱ्यांना अद्याप पेरणीची संधीच मिळाली नाही. गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला होता. गुरुवारी दुपारपर्यंत पावसाने चांगलीच उघडीप दिली होती. काही वेळ ऊनही पडले होते. उघडिपीमुळे खाचरात साचलेल्या पाण्याचा निचरा होऊन, भात रोपांची स्थिती सुधारण्यास मदत होईल तसेच रखडलेल्या खरीप पिकाच्या पेरण्या काही प्रमाणात तरी होतील, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र दुपारनंतर पावसाला पुन्हा सुरवात झाली. त्यामुळे उर्वरित पेरण्या होतील की नाही, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. तर सततच्या पावसामुळे काही शेतकऱ्यांची रोपे पाण्याखाली असल्याने ती सडून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.


फोटो ः 10023.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.