टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यात कसोटी मालिकेत विजयी सुरुवात करण्यात अपयशी ठरली. इंग्लंडने भारतावर मात करत 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशा फरकाने आघाडी घेतली.त्यानंतर श्रीलंकेने आज 28 जून रोजी दुसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात बांगलादेशवर डाव आणि 78 धावांनी मात करत जबरदस्त विजय मिळवला. श्रीलंकेने या विजयासह 2 सामन्यांची मालिका 1-0 अशा फरकाने जिंकली. उभयसंघातील पहिला सामना अनिर्णित राहिल्यानंतर दोन्ही संघांना मालिका जिंकण्याची समसमान संधी होती. मात्र यजमानांनी बांगलादेशवर मात करत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या साखळीतील आपली पहिली मालिका जिंकली. धनंजया डी सिल्वा याच्या नेतृत्वात श्रीलंकेने ही कामगिरी केली.
तर दुसऱ्या बाजूला या पराभवानंतर बांगलादेशचा कर्णधार नजमुल हुसैन शांतो याने मोठा निर्णय घेतला आहे. नजमुलने कसोटी कर्णधारपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. नजमुलने पराभवानंतर तातडीने कर्णधारपदाचा राजीनामा दिला. उभयसंघातील पहिला सामना हा गॉलमध्ये झाला. नजमुलने या सामन्यातील दोन्ही डावात शतक करत धमाका केला. मात्र नजमुल दुसऱ्या कसोटीत अपयशी ठरला. तसेच इतर फलंदाजही अपयशी ठरले. बांगलादेशच्या एकाही फलंदाजाला दुसऱ्या कसोटीत शतकही करता आलं नाही.
नजमुलने पहिल्या कसोटीत दोन्ही डावात 148 आणि नाबाद 125 धावा केल्या. मात्र दुसऱ्या सामन्यात नजमुलला 8 आणि 19 धावाच करता आल्या. दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर नजमुल फार निराश झाला.
“मला कसोटी संघाचं नेतृत्व करायचं नाही. संघाच्या फायद्यासाठीच हा निर्णय घेतला आहे. यामुळे टीमला फायदा होईल, असं मला वाटतं. मी गेली काही वर्ष ड्रेसिंग रुमचा भाग राहिलो आहे. 3 फॉर्मेटसाठी 3 कर्णधार हा निर्णय मला योग्य वाटत नाही. क्रिकेट बोर्ड या बद्दल काय विचार करेल? याबाबत मला माहित नाही. मात्र मी क्रिकेट बोर्डाच्या निर्णयाचं समर्थन करेन. मात्र हा माझा वैयक्तिक निर्णय आहे”, असं नजमुलने म्हटलं.
नजमुलकडून कर्णधारपदाचा राजीनामा
“मला वाटतं की संघासाठी 3 वेगवेगळ्या कर्णधारांसह समन्वय साधणं अवघड होईल. मी हा निर्णय भावनेच्या भरात घेतलाय किंवा मी निराश आहे, असा विचार कुणीही करु नये. मी संघाच्या फायद्यासाठीच हा निर्णय घेतला आहे. मी काही दिवसांपूर्वीच क्रिकेट बोर्डाला याबाबतची कल्पना दिली होती “, असंही नजमुलने स्पष्ट केलं.