भारतीय पुरुष, महिला आणि अंडर 19 संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारतीय संघ कसोटी मालिका खेळत आहे. तर अंडर 19 संघाची वनडे मालिका सुरु आहे. 28 जूनपासून भारतीय महिला संघ आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरु होणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे. पण या सामन्यापूर्वी भारतीय संघाला धक्का बसला आहे. कारण कर्णधार हरमनप्रीत कौर आजारी पडली आहे. याबाबतची माहिती उपकर्णधार स्मृती मंधाना हीने दिली आहे. स्मृती मंधानाने सांगितलं की, हरमनप्रीत कौरची तब्येत ठीक नाही. त्यामुळे ती पत्रकार परिषदेला येऊ शकली नाही. त्यामुळे पहिल्या टी20 सामन्यात खेळणार की नाही अशी चिंता क्रीडाप्रेमींना सतावत आहे. पण या बाबतचं स्पष्टीकरण उपकर्णधार स्मृती मंधाना हीने पत्रकार परिषदेत दिलं आणि क्रीडाप्रेमींचा जीव भांड्यात पडला.
स्मृती मंधानाने सांगितलं की, कर्णधार हरमनप्रीत कौर सामन्यात खेळणार आहे. फक्त तिला आज अस्वस्थ वाटत आहे. मी फक्त तिच्या जागी आली आहे. आम्ही येथे आधीच आलो असून आठ दिवसांपासून तयारी सुरु आहे. काही चांगले सराव सामने खेळलो. यात आम्ही इंग्लंडच्या परिस्थितीचा अंदाज घेतला. संघातील काही खेळाडूंचा हा पहिला इंग्लंड दौरा आहे. त्यामुळे लवकरणं येऊन सराव करणं महत्त्वाचं होतं. त्यांनी या वातावरणाची सवय झाली असून तयारी चांगली सुरु आहे.
‘पुढच्या वर्षी ब्रिटेनमध्ये टी20 वर्ल्डकप होणार आहे. यावेळी परिस्थिती काहीशी अशीच असणार आहे. मला विश्वास आहे की पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत मुली चांगली कामगिरी करतील.’, असंही स्मृती मंधानाने पुढे सांगितलं. पुढच्या वर्षी जून 12 ते जुलै 5 या कालावधीत महिला टी20 वर्ल्डकप होणार आहे.
टी20 मालिकेसाठी भारतीय संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमा रोड्रिग्ज, शफाली वर्मा, स्मृती मंधाना, अमनजोत कौर, दीप्ति शर्मा, हरलीन देओल, सयाली सातघरे, स्नेह राणा, ऋचा घोष, यास्तिका भाटिया, अरुंधति रेड्डी, क्रांति गौड़, राधा यादव, श्री चरणी.