भारतीय कसोटी संघाला शुबमन गिल याच्या नेतृत्वात पहिल्याच सामन्यात पराभूत व्हावं लागलं आहे. इंग्लंडने लीड्समध्ये खेळवण्यात आलेला सामना 5 विकेट्सने जिंकला. इंग्लंडला विजयासाठी 371 धावांचं आव्हान मिळालं होतं. इंग्लंडने चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत बिनबाद 21 धावा केल्या. तर पाचव्या आणि अंतिम दिवशी इंग्लंडने 350 धावा करत विजय साकारला. इंग्लंडने यासह 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. आता उभयसंघातील दुसरा सामना हा 2 जुलैपासून होणार आहे.
शुबमन गिल याच्या कसोटी कारकीर्दीतील कर्णधार म्हणून हा पहिला सामना होता. शुबमनला कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात भारताला विजयी करण्याची संधी होती. मात्र भारतीय संघाने अनेक संधी गमावल्या. त्यामुळे सामना इंग्लंडने जिंकला. भारताकडून या सामन्यात 4 फलंदाजांनी 5 शतकं केल्यानंतरही पराभूत व्हावं लागलं. टीम इंडियाच्या टॉप फलंदाजांनी शानदार कामगिरी केली. मात्र या सामन्यातील काही चुकांमुळे भारताने इंग्लंडला विजयी होण्यास मदत केली, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. भारताचं या सामन्यात नक्की काय चुकलं? हे सविस्तर जाणून घेऊयात.
भारतीय संघाला खराब फिल्डिंगमुळे हा सामना गमवावा लागला. भारताने या सामन्यातील पहिल्या डावात 6 तर दुसऱ्या डावात 2 असे एकूण 8 कॅचेस सोडल्या. कहर म्हणजे एकट्या यशस्वी जैस्वाल याने 4 कॅचेस ड्रॉप केल्या. तर रवींद्र जडेजा, ऋषभ पंत, साई सुदर्शन आणि जसप्रीत बुमराह या चौघांनी प्रत्येकी 1-1 कॅच सोडली.
बेन डकेट याला पहिल्या डावात 11 धावांवर 2 वेळा जीवनदान मिळालं.डकेटने या 2 जीवनदानाच्या जोरावर 62 धावा केल्या. तर दुसऱ्या डावात डकेटला 97 धावांवर जीवनदान मिळालं. डकेटने या संधीचा फायदा घेतला आणि 149 धावा केल्या. ओली पोप याला पहिल्या डावात 60 धावांवर जीवनदान मिळालं. पोपने या संधीचा फायदा घेत 106 रन्स मिळाल्या.
हॅरी ब्रूक याचा टीम इंडियाने 82 धावांवर कॅच सोडला. ब्रूकने त्यानतंर आणखी 17 धावा जोडल्या. तसेच ब्रूक जसप्रीत बुमरहच्या बॉलिंगवर झिरोवरच कॅच आऊट झाला होता, मात्र तो बॉल होता. त्यामुळे ब्रूक वाचला. तर दुसऱ्या डावात जेमी स्मिथ आणि झॅक क्रॉली यांनाही जीवनदान मिळालं.
टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरमधील फलंदाजांनी शानदार कामगिरी केली. यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल आणि केएल राहुल या तिघांनी प्रत्येकी 1-1 शतक केलं. तर ऋषभ पंत याने दोन्ही डावात शतक केलं. टीम इंडियाने या साम्यात 786 धावा (अतिरिक्त वगळून) केल्या. यापैकी 691 धावा या चौघांनीच केल्या. तर 7 फलंदाजांना एकूण 95 धावाच करता आल्या. तर भारताला 49 धावा या अतिरिक्त मिळाल्या.
थोडक्यात काय तर शेपटीच्या फलंदाजांनी घोर निराशा केली. पहिल्या डावात भारताने 41 धावांच्या मोबदल्यात 7 तर दुसऱ्या डावात 31 धावांच्या मोबदल्यात 6 विकेट्स गमावल्या. त्यामुळे भारतीय संघ आणखी मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरली.
भारतीय संघाने या सामन्यासाठी 4 वेगवान गोलंदाजांना संधी दिली. हा निर्णय बहुतांश प्रमाणात चुकीचा ठरला. भारताला चायनामॅन कुलदीप यादवची उणीव भासली. कुलदीपमध्ये बॉल फिरवण्याची क्षमता आहे. त्यामुळे कुलदीप इंग्लंडसाठी डोकेदुखी ठरु शकला असता. तसेच रवींद्र जडेजा यालाही कुलदीपची साथ मिळाली असती. तसेच प्रसिध कृष्णा किंवा मोहम्मद सिराज या दोघांपैकी कुणा एकाच्या जागी अर्शदीप सिंह याला संधी देता आली असती. मात्र तसंही झालं नाही.
शुबमन गिल याचा कर्णधार म्हणून हा पहिला सामना होता. मात्र शुबमनला भारतीय संघाचं नेतृत्व करता आलं नाही, असं म्हटलं जातंय. शुबमनने शार्दूल ठाकुर याचं निट उपयोग करुन घेतला नाही. शार्दुलला पहिल्या डावात 6 षटकंच टाकायला दिली. तर शुबमनने शार्दुलला दुसऱ्या डावातही फार संधी दिली नाही. तसेच शुबमनवर बचावात्मक फिल्डिंग लावल्याचा आरोपही करण्यात आला.
जसप्रीत बुमराह याचा अपवाद वगळता भारतीय संघाने पहिल्या सामन्यात सुमार बॉलिंग केली. बुमराहने पहिल्या डावात सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तर बुमराहला दुसर्या डावात एकही विकेट घेता आली नाही. मात्र बुमराहने सहजासहजी धावा दिल्या नाहीत. तर इतर गोलंदाजांनी धावांचा पाऊस पाडला. प्रसिधने 6 पेक्षा अधिकच्या इकोनॉमीने रन्स दिल्या. तसेच मोहम्मद सिराज आणि रवींद्र जडेजा यांना त्यांच्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आली नाही.