हिर्डोशी, ता. २८ : पिसावरे (ता.भोर) येथे कृषी विभागाने एसआरटी (सगुणा राईस टेक्नॉलॉजी) हे शून्य मशागत शेती तंत्रज्ञानाचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. भोरचे तालुका कृषी अधिकारी शरद धर्माधिकारी यांनी बुधवारी (ता.२५) बांधावर जाऊन प्रात्यक्षिक दाखविले. भात शेतीसाठी नांगरणी, चिखलणी व लावणी न करता कायम स्वरूपी गादीवाफ्यावर टोकणणी करून भाताचे अधिक उत्पादन घेता येते.
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय कोचाळे, प्रकल्प संचालक सूरज मडके यांच्या मार्गदर्शनाखाली खरीप हंगाम मोहिमेतून एसआरटी पद्धतीचा वापर करून भाताचे उत्पादन घेण्याची प्रात्यक्षिके राबविण्यात येत आहेत.
यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी प्रशिका निकाळजे विविध योजनांची माहिती देऊन खरीप हंगामात फळबाग व बांबू लागवडीसाठी मार्गदर्शन केले. विजय बांदल व उज्ज्वला बांदल यांनी शेतकऱ्यांना गादीवाफा कसा करायचा याबाबत प्रात्यक्षिक करून दाखवले.
एसआरटी तंत्राचा फायदा
१. मशागतीचा खर्च कमी
२. बियाणे व खतांची बचत
३. मजुरीची बचत होऊन उत्पादनात वाढ
४. जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढतो
एसआरटीपद्धतीत वापरलेल्या गादीवाफ्यामुळे भात रोपांच्या मुळाशी प्राणवायूचे सुयोग्य प्रमाण तसेच पुरेसा वाफसा राहतो. साच्यामुळे दोन रोपांमधील नेमके आणि सुयोग्य अंतर राहते परिणामी रोग व किडींचा त्रास कमी होतो तसेच विपुल प्रमाणात अपोआप गांडूळ वाढतात त्यामुळे शेतकऱ्यांनी या पद्धतीने शेती करावी.
- लक्ष्मीकांत कणसे, तंत्र व्यवस्थापक, भोर तालुका
02058