आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या साखळीची आठवड्याभराआधी सुरुवात झाली आहेत. टीम इंडिया आणि इंग्लंड दोन्ही संघांनी या साखळीतील पहिला सामना एकमेकांविरुद्ध खेळला. भारताला या सामन्यात पराभूत व्हावं लागलं. इंग्लंडने लीड्समध्ये झालेल्या या सामन्यात 5 विकेट्सने विजय मिळवला. आता उभयसंघात कसोटी मालिकेतील दुसरा सामना हा 2 जुलैपासून खेळवण्यात येणार आहे. इंग्लंडला दुसरा सामना जिंकून इतिहास घडवण्याची संधी आहे. इंग्लंडला दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी करण्याची संधी आहे.
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप या स्पर्धेला 2019 पासून सुरुवात झाली आहे. तेव्हापासून आतापर्यंत या स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक सामने जिंकण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड हा ऑस्ट्रेलियाच्या नावावर आहे. मात्र इंग्लंड ऑस्ट्रेलियाच्या या विक्रमाच्या मागे हात धुवून लागली आहे. इंग्लंड टीम इंडियावर मात केल्यानंतर डब्ल्यूटीसीमध्ये सर्वाधिक सामने जिंकणाऱ्या संघाच्या यादीत दुसऱ्या स्थानी पोहचली आहे. तर दुसऱ्या बाजूला ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजवर पहिल्या कसोटीत मात करत आपला विक्रम आणखी भक्कम केला आहे. ऑस्ट्रेलियाने डब्ल्यूटीसी स्पर्धेत आतापर्यंत 55 पैकी 34 सामने जिंकले आहेत.
इंग्लंड विरुद्ध इंडिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना हा बर्मिंगहॅममधील एजबेस्टनमध्ये येथे होणार आहे. इंग्लंडला हा सामना जिंकून ऑस्ट्रेलियाच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी करण्याची संधी आहे. इंग्लंडने या स्पर्धेत आतापर्यंत 66 पैकी 33 सामने जिंकले आहेत. तर यादीत टीम इंडिया तिसर्या स्थानी आहे. भारतीय संघाने आतापर्यंत 57 पैकी 31 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर चौथ्या क्रमांकावर गतविजेता दक्षिण आफ्रिका विराजमान आहे. दक्षिण आफ्रिकेने 41 पैकी 22 सामने जिंकले आहेत.
इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील कसोटी मालिकेतील आणखी 4 सामने खेळवण्यात येणार आहेत. त्यामुळे इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात या वर्ल्ड रेकॉर्डसाठी चढाओढ पाहायला मिळणार आहे. ऑस्ट्रेलियाला विंडीज विरुद्ध 2 कसोटी सामने खेळायचे आहेत. त्यामुळे दोन्ही मालिका संपल्यानंतर कोणता संघ पहिल्या स्थानी असणार? याकडे साऱ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष असेल.