वूमन्स टीम इंडियाने स्मृती मंधानाच्या नेतृत्वात इंग्लंडवर 97 धावांच्या ऐतिहासिक फरकाने मात करत टी 20i मालिकेची विजयाने सुरुवात केली. इंग्लंड विरुद्ध इंडिया यांच्यातील 5 सामन्यांच्या टी 20i मालिकेतील पहिला सामना हा 28 जून रोजी ट्रेंटब्रिज,नॉटिंघम येथे खेळवण्यात आला. टीम इंडियाने इंग्लंडला विजयासाठी 211 धावांचं अवघड आव्हान दिलं होतं. मात्र इंग्लंडच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांसमोर गुडघे टेकले. इंग्लंडला पूर्ण 20 ओव्हरही खेळता आलं नाही. भारताने इंग्लंडला 14.5 ओव्हरमध्ये 113 रन्सवर ऑलआऊट केलं आणि 97 धावांनी दणदणीत विजय मिळवला. इंग्लंड वूमन्स टीमचा हा टी 20 इतिहासातील सर्वात मोठा पराभव ठरला.