राज ठाकरेंशी बोलल्यावर आमदाराला झापलं, आता तेच…ठाकरे बंधूंच्या युतीवर उदय सामंतांचा हल्लाबोल!
GH News June 29, 2025 06:07 PM

 Uday Samant : इयत्ता पहिलीपासून तृतीय भाषा म्हणून हिंदी भाषा शिकवणीच्या धोरणाला विरोधकांकडून कडाडून विरोध केला जातोय. काहीही झालं तरी आम्ही ही हिंदीसक्ती होऊ देणार नाही, अशी थेट भूमिका विरोधकांनी घेतली आहे. याच मागणीला घेऊन आज ठाकरे गटाकडून हिंदीसक्ती करणाऱ्या शासन निर्णयाची होळी करण्यात आली आहे. ठाकरे गटाने राज्यभर जीआरची होळी करण्याचे आंदोलन राबवले आहे. विशेष म्हणजे येत्या 5 जुलै रोजी ठाकरे गट आणि मनसे एकत्र मोचा काढणार आहेत. याच कारणामुळे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसेचे प्रमुख राज ठाकरे हे दोन्ही बंधू आगामी पालिका निवडणुकीसाठी एकत्र येणार का? असे विचारले जात आहे. यावरच आता मंत्री उदय सामंतांनी ठाकरे गटाला डिवटले आहे.

त्यामुळेच त्यांना मनसेच्या मोर्चात जावं लागतंय

हिंदी सक्तीला विरोध म्हणून ठाकरे गटाकडून 29 जून रोजी हिंदीसक्तीच्या जीआरची होळी करण्यात आली. तसेच येत्या 5 जुलै रोजी मोठ्या मोर्चाचे आयोजन करण्यात येणार आहे. यावर बोलताना उदय सामंत यांनी ठाकरे गटावर खरपूस शब्दांत टीका केली. आपल्या मोर्चाला किती लोकं येतील, याबाबत ठाकरे गटाच्या मनात शंका आहे. त्यामुळेच त्यांना मनसेच्या मोर्चात जावं लागतंय. मनसेने त्यांना नाकारलं तरी त्यांना त्यांच्यासोबत जायचं आहे, अशी खोचक टीका उदय सामंत यांनी केली.

17 वर्षांत त्यांचा राज ठाकरेंशी संवाद नाही, पण आता…

पुढे उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीवरही भाष्य केलं. मला काही ज्येष्ठ आमदारांनी सांगितलं की गेल्या 17 वर्षात राज साहेबांशी संवाद झाला नाही. पण आता तेच खासदार संजय राऊत किती उतावीळ झाले आहेत बघा. राज ठाकरे यांच्याशी बोलल्यावर राऊतांनी आमदाराला झापलं होतं. तेच राऊत आता युती करायला उतावीळ झाले आहेत. काही दिवसांपूर्वी संजय राऊत NCP ची भूमिका मांडत होते, आता ते मनसेची भूमिका मांडत आहेत, असा थेट हल्लाबेल उदय सामंत यांनी ठाकरे गटावर घेतला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.