ENG vs IND : कॅप्टन शुबमनचा एक मेसेज आणि टीम इंडियात खेळाडूची डायरेक्ट एन्ट्री, दुसऱ्या कसोटीआधी मोठा निर्णय
GH News June 30, 2025 02:05 AM

भारतीय क्रिकेट संघाने इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिकेतील जिंकण्यासारखा सामना गमावला. इंग्लंडने सलामीच्या सामन्यातील पाचव्या दिवशी 24 जून रोजी टीम इंडियावर मात केली. इंग्लंडने यासह 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. आता दोन्ही संघातील दुसरा सामना हा 2 जुलैपासून बर्मिंगहॅममधील एजबेस्टन मैदानात होणार आहे. टीम इंडियाच्या मनात पहिल्या पराभवाची सल आहे. त्यामुळे टीम इंडियाचा दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून मालिकेत 1-1 ने बरोबरी करण्याचा प्रयत्न असणार आहे. दुसऱ्या सामन्याआधी टीम इंडियात एक नवा खेळाडू दिसला. आता त्या खेळाडूबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

कॅप्टन शुबमनने मेसेज करुन खेळाडूला बोलावलं

दुसऱ्या कसोटीआधी टीम इंडियासोबत अनकॅप्ड स्पिनर हरप्रीत ब्रार याने नेट्समध्ये सराव केला. हरप्रीतची भारतीय संघात निवड करण्यात आलेली नाही. त्यानंतरही हरप्रीतने भारतीय संघासोबत सराव केला. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात आलं. आता स्वत: हरप्रीतने कुणाच्या सांगण्यावरुन टीम इंडियासोबत नेट्स प्रॅक्टीस केली? याबाबत सांगितलं आहे. कर्णधार शुबमन गिल याच्या मेसेजनंतर टीम इंडियासह नेट्समध्ये दाखल झाल्याचं हरप्रीतने सांगितलं.

“माझ्या बायकोचं स्विडनमध्ये घर आहे. बर्मिंगहॅम घरापासून दीड तासांच्या अंतरावर आहे. मी शुबमनसोबत बोलत होतो. तेव्हा शुबमनने मला मेसेज केला. मी विचार केली की तिथे सराव करूयात. हा एक वेगळा अनुभव आहे. सरावामुळे आपल्या कुटुंबासोबत आल्यासारखं वाटलं”, असं हरप्रीत ब्रार याने म्हटलं. बीसीसीआयकडून हरप्रीतचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे.

पहिल्या कसोटीत गोलंदाजांकडून निराशा

दरम्यान हेडिंग्लमध्ये झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने भारतावर 5 विकेट्सने विजय मिळवला. टीम इंडियाने इंग्लंडला विजयासाठी 371 धावांचं आव्हान दिलं होतं. इंग्लंडने हे आव्हान 5 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. इंग्लंडच्या या विजयानंतर टीम इंडियाच्या प्लेइंग ईलेव्हनवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. अनुभवी ऑलराउंडर रवींद्र जडेजा याने घोर निराशा केली. जडेजाला एकही विकेट घेता आली नाही.

पहिल्या कसोटीत जसप्रीत बुमराहने टीम इंडियासाठी सर्वाधिक विकेट्स घेतल्या. मात्र बुमराहला दुसऱ्या बाजूने अपेक्षित साथ मिळाली नाही. बुमराहने पहिल्या डावात 5 विकेट्स घेतल्या. मात्र बुमराहला दुसऱ्या डावात एकही विकेट घेता आली नाही. तसेच भारतीय खेळाडूंनी सुमार फिल्डिंग केली. भारताने एकूण 8 कॅचेस सोडल्या. परिणामी भारताला सामना गमवावा लागला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.