नालासोपारा : विरारच्या अर्नाळा किल्ल्याच्या समुद्र किनाऱ्यावर महिला आणि पुरुषाचे दोन मृतदेह आज रविवार ता 29 रोजी सकाळी आढळले होते. अर्नाळा पोलिसांनी या दोन्ही मृतदेहाला ताब्यात घेऊन शवविच्छेदन साठी पाठवून तपास केला असता सापडलेले मृतदेह हे पती पत्नीचे असून, त्यांनी दोघांनी एकत्र आत्महत्या केली असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. मात्र ही आत्महत्या का आणि कशासाठी केली याचे कारण स्पष्ट झाले नसून, याचा तपास सुरू असल्याची माहिती अर्नाळाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कदम यांनी दिली आहे.
शिवाजी शिंदे ( वय 54 ) आणि पत्नी रंगीता शिंदे (वय 48) असे आत्महत्या केलेल्या पती पत्नीचे नाव असून, हे विरार पूर्वेचे राहणारे आहेत. काल पती पत्नी आम्ही फिरायला चाललो म्हणून घरातून बाहेर पडले होते. काल शनिवारी समुद्रात मोठ्या प्रमाणात भरती आणि सुसाट्याचा वारा होता. पती पत्नी वसई विरारच्या एखाद्या समुद्र किनाऱ्यावर आले असू शकतात, आणि त्यात त्यांनी समुद्राच्या किनाऱ्यावर भरतीच्या पाण्यात उडी मारली असू शकते, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.
नेमकं प्रकरण काय?आज रविवार ता 29 रोजी अर्नाळा किल्ला परिसरातील कालिका माता मंदिरात समुद्राच्या किनाऱ्याच्या झाडा झुडपात अर्धनग्न अवस्थेत पत्नीचा तर बाजूलाच पूर्ण कपड्यात पतीचा मृतदेह स्थानिक गावकऱ्यांना आढळला होता. याची पोलिसांना तात्काळ माहिती दिल्यानंतर अर्नाळा पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन, याची चौकशी केली.
त्यानंतर पती पत्नीने एकत्र आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. मात्र ही खरोखर आत्महत्या आहे की हत्या आहे, या आत्महत्येचे कारण काय? आर्थिक विवंचनेतून की याला अन्य काही कारण आहे याचा पोलीस आता तपास करीत आहेत.
Thane News: ई-वाहनांना मिळणार टोल माफी, शासनाची नवी योजना; परिवहन मंत्र्यांनी दिली माहिती