वडेट्टीवार म्हणाले, रायगडमध्ये एका दिवसात 6 बलात्कार; पोलीस अधिक्षकांनी दावा फेटाळला
Marathi July 04, 2025 12:25 AM

रायगड : राज्यातील महिला अत्याचाराच्या घटनांवरुन प्रश्न उपस्थित करताना काँग्रेस नेते आणि आमदार विजय वडेट्टीवार (Vijay wadettiwar) यांनी रायगड जिल्ह्याचं उदाहरण दिलं. रायगड जिल्ह्यात एका दिवशी ६ बलात्कार झाले, उर्वरित महाराष्ट्रात काय अवस्था असेल याचा विचार करा. राज्यात महिलांवर अत्याचार वाढत असताना सरकार शक्ती कायदा का लागू करत नाही, असा सवाल वडेट्टीवार यांनी पावसाळी अधिवेशनादरम्यान सभागृहाबाहेर पत्रकारांशी संवाद साधताना उपस्थित होता. मात्र, रायगड जिल्ह्यात एकाच दिवसात 6 बलात्कार घडल्याचा दावा खोटा असल्याचे रायगडच्या (Riagad) पोलीस अधीक्षक आंचल दलाल (पोलिस) यांनी म्हटलं आहे. दलाल यांनी विजय वडेट्टीवार यांचा दावा फेटाळून लावला असून ही चुकीची माहिती असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

रायगड जिल्ह्यात एकाच दिवसात सहा बलात्कार झाल्याचा धक्कादायक आरोप काँग्रेसचे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी विधानभवनाबाहेर पत्रकारांशी बोलताना आज केला. त्यानंतर, अशी कोणतीच घटना घडली नसून ही संपूर्ण चुकीची माहिती असल्याचे उघड करत रायगडच्या पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांनी वडेट्टीवार यांनी केलेले आरोप फेटाळले आहेत. रायगडमधील तळा तालुक्यात एका आदिवासी पाड्यावर आशा वर्कर्स महिलांनी 10 दिवसांपूर्वी घेतलेल्या एका आरोग्य शिबिरात काही मुली या गर्भवती असल्याचे आढळून आले होते. मात्र, त्या वेगवेळ्या काळातील गर्भवती असल्याची माहिती आहे, असेही त्यांनी स्पष्टीकरण दिले. याशिवाय त्या मुलींचे त्या त्या मुलांबरोबर लग्न देखील लाऊन देण्यात आले आहे, अशी माहिती आंचल यांनी दिली. दरम्यान, रायगडमधील घटनांची माहिती देत एका दिवसात 6 बलात्कार ही चुकीची माहिती असल्याच पोलीस अधीक्षकांनी म्हटलं. या प्रकरणात तळा पोलिस ठाण्यात गुन्हा देखील दाखल झाला आहे. मात्र, त्या आदिवासी समाजाची इच्छा नसताना देखील एक पॉझिटिव्ह दृष्टीकोन म्हणून आपण हा गुन्हा नोंद केला असल्याचं त्यांनी सांगितलं.

वडेट्टीवारांनी शेतकऱ्यांची कैफियत मांडली

राज्यातील बळीराजा संकटात सापडल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे, जानेवारी ते मार्च महिन्यात 767 शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत, यावरून स्थिती स्पष्ट होते. शेतकरी पोटाची खळगी भरण्यासाठी रात्रं-दिवस घाम गळतो, शेतात राबतो. पण, त्याला दाम मिळत नाही, त्या शेतकऱ्याला शेवटी मृत्यूला कवटाळावे लागते. कधी कोरडा, कधी ओला दुष्काळ, पावसाचा लहरीपणामुळे बळीराजाच्या स्वप्नांची राखरांगोळी होते. शेतकऱ्यांच्या जीवनात सुधारणा आणण्यासाठी आधुनिक संपन्न स्थितीचा निर्णय घ्यावा लागेल, असे वडेट्टीवार यांनी म्हटले. बळीराजा सगळ्यांना पोसतो, त्याचा अवमान या राज्यात कधी नव्हे इतका अपमान सत्तेत बसून करत आहात. काही देऊ शकत नाही तर अपमान करू नका, हिणवू नका सत्ताधारी कृषिमंत्री यांना पंढरीच्या पांडुरंगा सद्बुद्धी द्या, असेही वडेट्टीवार यांनी म्हटले.

हेही वाचा

उद्धव ठाकरेंकडूनच राज ठाकरेंच्या घातपाताचा प्लॅन; रामदास कदमांचा खळबळजनक दावा, स्फोटक मुलाखत

आणखी वाचा

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.