उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथील सर्किट हाऊसमध्ये राज्यमंत्र्यांच्या बैठकीत खळबळ. भाजपचे समाजकल्याण राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) असीम अरुण यांच्या बैठकीदरम्यान भाजप किसान मोर्चाच्या जिल्हाध्यक्षांच्या गाडीत 6 फूट लांबीचा साप शिरला. गाडीत साप रेंगताना दिसताच उपस्थितांमध्ये एकच गोंधळ उडाला. तातडीने सर्प मित्राला बोलावण्यात आले. काही तासांच्या मेहनतीनंतर अखेर सापाला बाहेर काढण्यात यश आले.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, सर्किट हाऊसमध्ये राज्यमंत्री असीम अरुण एका बैठकीत सहभागी होते. त्याचवेळी बाहेरून ओरडण्याचा आवाज येऊ लागला. चौकशी केल्यावर समजले की, भाजप किसान मोर्चाच्या जिल्हाध्यक्षांच्या गाडीत साप आहे. ही माहिती मिळताच सर्किट हाऊसमधील अधिकाऱ्यांनी तात्काळ वन विभागाला सूचना दिली. सूचनेनंतर काही वेळातच वन विभागाची टीम घटनास्थळी पोहोचली आणि सापाला गाडीतून बाहेर काढण्याची मोहीम सुरू केली. अनेक तासांच्या कठोर प्रयत्नांनंतर सापाला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. त्याला एका पिशवीत ठेवून शहराबाहेरील सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आले. या घटनेचा व्हिडीओ उत्तर प्रदेशमधील एका वृत्तवाहिनीने शेअर केला आहे.
वाचा: ‘या’ झाडाला चिटकूनच बसतात विषारी साप, काय असतं कारण?
#मुरादाबाद सर्किट हाउस में बीजेपी किसान मोर्चा के जिलाध्यक्ष की कार में करीब 6 फीट लंबा सांप घुस गया। घटना के वक्त मंत्री असीम अरुण वहीं सर्किट हाउस में अन्य नेताओं और अधिकारियों के साथ बैठक कर रहे थे। बड़ी के बाद सांप को कार से बाहर निकाला जा सका। @asim_arun pic.twitter.com/IlJYFMvlM7
— UttarPradesh.ORG News (@WeUttarPradesh)
साप विषारी नव्हता
सुदैवाने हा साप विषारी नव्हता आणि वेळीच लोकांच्या नजरेस पडला, अन्यथा मोठी दुर्घटना घडू शकली असती. सर्किट हाऊसच्या मागील मोकळ्या मैदानात आणि पावसामुळे साप तिथे पोहोचला असावा, असे सांगितले जाते. भिंतीच्या आधाराने तो परिसरात शिरला आणि गाडीच्या खाली लपला. या घटनेनंतर जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. सर्किट हाऊसमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्याचे आणि सापांपासून संरक्षणासाठी वन विभागाला मोहीम राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आता सर्किट हाऊसच्या आसपासच्या परिसरात वन विभागाची टीम नियमित तपासणी करेल.
सापाचा रेस्क्यू
राज्यमंत्र्यांच्या कार्यक्रमादरम्यान अशा प्रकारची घटना घडल्याने सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. सुदैवाने सापाला वेळीच पकडण्यात आले आणि कोणालाही इजा झाली नाही, तरीही काही काळ लोकांमध्ये दहशतीचे वातावरण होते.