Uddhav Thackeray And Raj Thackeray : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा 5 जुलै रोजी एकत्र विजयी मेळावा झाला. तब्बल 19 वर्षांनी हे दोन्ही भाऊ एकत्र आल्याने आता राज्यातील राजकीय गणितं बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पण हे दोन्ही भाऊ एकत्र आल्यानंतर पुढच्या काही दिवसांत घडलेल्या घडामोडींमुळे मात्र ठाकरे बंधूंच्या एकत्रिकरणाविषयी वेगवेगळे तर्क व्यक्त केले जात आहे. राजकीय विश्लेषक संजीव उन्हाळे यांनीही राज ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेचे काही अर्थ लावले असून भविष्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांची ज्या दिवशी भाषणे झाली त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपावर तोफा डागल्या. त्या वेळी राज ठाकरे थोडे राखूनच बोलले. राज ठाकरे हे मराठीबद्दल बोलले. राज ठाकरे यांच्या याच भूमिकेची भाजपाने प्रशंसा केली. एकंदरीत राज ठाकरे यांची भूमिका अजून स्पष्ट झालेली नाही, असेच एकंदरीत चित्र दिसत आहे, असे विश्लेषण उन्हाळे यांनी केले आहे.
तसेच, दुसऱ्या बाजूला राज ठाकरे यांनीही आपल्या लोकांना सांगितले आहे, ठाकरे गटाच्या युतीसंदर्भात कोणतेही निवेदन करू नका. म्हणजे ‘वेट अँड वॉच’ अशी भूमिका राज ठाकरे यांनी घेतलेली आहे. राज ठाकरे विचार करून निर्णय घेतील. परंतु हा निर्णय घेत असताना त्यांना मराठी माणसाचा जनमताचा रेटा याचा विचार करावा लागेल, असा तर्क उन्हाळे यांनी काढला आहे. दुसऱ्या बाजूला एकंदर राजकीय स्थिती उद्धव ठाकरे यांना पूरक नाही. तेव्हा सर्व वस्तुस्थितीचा विचार करूनच राज ठाकरे निर्णय घेतील. राज ठाकरे हे युतीसंदर्भात अंतिम निर्णयापर्यंत आलेले आहेत,असे या क्षणाला वाटत नाही, असा अंदाजही उन्हाळे यांनी व्यक्त केला.
निशिकांत दुबे यांनी ज्या पद्धतीने आज आगपाखड केली. यावर उबाठा गटाने प्रतिक्रिया दिली. पण त्यावर मनसेची प्रतिक्रिया आलेली नाही. राज ठाकरे याबाबत धीमेपणाने निर्णय घेतील. उद्धव ठाकरे हे भाऊ राज ठाकरे बरोबर आहेत, असे अजून तरी या क्षणाला म्हणता येत नाही. लवकरच राज ठाकरे आपली प्रतिक्रिया देतील आणि महाराष्ट्र त्यांच्या प्रतिक्रियेकडे लक्ष देऊन आहे, असे मत उन्हाळे यांनी व्यक्त केले.
मनसेचे अस्तित्व वेगळे आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांच्या मनसेचे विलीनीकरण झाले किंवा व्हावे असेही कोणी म्हणत नाही. मनसेने विरोधी पक्षाची भूमिका घ्यायची की सत्ताधाऱ्यांमध्ये सामील व्हायचे, हा निर्णय राज ठाकरे यांना घ्यायचा आहे, असेही मत उन्हाळे यांनी व्यक्त केले. तसेच राज ठाकरे निर्णय घेण्यासाठी वेळ घेत असतील. ते काय निर्णय घेतात याकडे आता सर्वांचे लक्ष आहे.सध्यातरी राज ठाकरे यांची भूमिका अजूनही स्पष्ट झालेली नाही असे सांगत भविष्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.