बी-बियाणे खरेदीसाठी खामगाव शहरात आलेल्या एका शेतकऱ्याला एटीएम कार्ड मशीनमध्ये विसरून जाण्याची मोठी किंमत मोजावी लागली आहे. त्यांच्या खात्यातून १६ हजार ५०० ची रक्कम काढून घेतल्याची घटना उघडकीस आली आहे.
यानंतर खामगाव शहर पोलिसांनी तातडीने तपास करत एका युवकाला अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीकडून एटीएम कार्ड आणि लंपास केलेली संपूर्ण रक्कम जप्त केली असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पारखेड येथे राहणारे शेतकरी बळीराम इंगळे यांच्यासोबत ही घटना घडली. काही दिवसांपूर्वी ते बी-बियाणे खरेदीसाठी खामगाव शहरात आले होते. त्यावेळी त्यांच्याकडील रोख रक्कम संपल्याने त्यांनी युको बँकेच्या एटीएममधून पैसे काढले.
मात्र, घाईगडबडीत ते आपले एटीएम कार्ड मशीनमध्येच विसरून निघून गेले. दोन दिवसांनंतर, जेव्हा त्यांनी आपल्या खात्यातील शिल्लक तपासली, तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला. त्यांच्या खात्यातून १६ हजार ५०० ची रक्कम अनोळखी व्यक्तीने काढल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
या प्रकारानंतर बळीराम इंगळे यांनी तात्काळ खामगाव शहर पोलिसांत तक्रार नोंदवली. या गंभीर घटनेची दखल घेत पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. एटीएममधील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा माग काढला.
अथक प्रयत्नांनंतर पोलिसांनी शहरातील एका युवकाला ताब्यात घेतले. याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. खामगाव शहर पोलिसांनी आरोपीकडून शेतकऱ्याचे एटीएम कार्ड आणि लंपास केलेली संपूर्ण रक्कम जप्त केली आहे. आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी अधिक माहिती देताना ठाणेदार रामकृष्ण पवार यांनी सांगितले की, शेतकऱ्याच्या तक्रारीनंतर आम्ही तात्काळ तपास सुरू केला. तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून चोरी केलेली रक्कम आणि एटीएम कार्ड हस्तगत करण्यात आले आहे. नागरिकांनी एटीएम वापरताना अधिक दक्षता घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
ही कारवाई खामगाव शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणि जलद तपासामुळे शक्य झाली आहे. यामुळे बळीराम इंगळे यांना त्यांचे पैसे परत मिळण्यास मदत झाली आहे.