आई-बाबा माफ करा, भावस्पर्शी चिठ्ठी लिहून 16 वर्षीय मुलाने संपवलं जीवन; शिक्षण क्षेत्रात खळबळ
Marathi July 15, 2025 06:25 PM

नागपूर: आपल्या मुलाने शिकून सवरुन मोठं व्हावं, आपलं आणि स्वत:चं नाव कमवावं अशी सर्वच पालकांची इच्छा असते. मुलांना चांगलं शिक्षण देता यावं म्हणून पालक कष्टही घेतात, खर्चही करतात. मात्र, याचवेळी अपेक्षाचं ओझं मुलांवर लादलं जातं. तू इंजिनिअरच हो, तू डॉक्टरच (Doctor) हो.. असे म्हणत मुलांवर वेगळाच दबाव टाकला जातो. शेवटी, आई-वडिलांच्या इच्छेखातर किंवा दबावापोटी ही शाळेतील मुले, कॉलेजमधील मुले झेपत नसतानाही इंजिनिअरींग किंवा मेडीकलला प्रवेश घेतात. मात्र, पुढे शिक्षणाचा ताण किंवा अभ्यासक्रम सहन न झाल्याने टोकाचं पाऊल उचलतात. नागपूरमध्येही (Nagpur) अशीच धक्कादायक घटना घडली असून आई-वडिलांनी आपल्या लाडक्या मुलाला गमावलं आहे. मुलाने कुटुंबीयांची काळजी व्यक्त करत आपलं जीवन संपवलं आहे.

नागपूरच्या अंबाझरी पोलीस ठाण्याअंतर्गत धक्कादायक घटनेची नोंद झाली आहे. नागपूरसह सर्वच पालकांना हादरवून टाकणारी ही बातमी आहे. देशभरातली लाखो पालकांसाठी एक कटूसत्य असेच हे वृत्त असून अपेक्षांचे ओझे मुलांवर लादणाऱ्या पालकांनी निश्चितच यातून बोध घ्यायला हवा. येथील 16 वर्षीय ख्वाहिश देवराम नागरे या विद्यार्थ्याने सोमवारी शैक्षणिक दबावातून आपले जीवन संपवले. ख्वाहिशने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. तत्पूर्वी आपल्या पालकांसाठी अत्यंत भावनिक आणि हृदयस्पर्शी सुसाईड नोट लिहिली आहे. ख्वाहिशने लिहिलेली चिठ्ठी प्रत्येक पालकांसाठी एकप्रकारे इशारा आणि डोळ्यातून पाणी आणणारी आहे. ज्या पालकांना वाटते की, त्यांची मुले सर्व प्रकारच्या दबावांना तोंड देऊ शकतात.

ख्वाहिशने चिठ्ठीत लिहिले की, “सॉरी आई-बाबा, मी हे करू शकणार नाही.. मी दीड आठवड्यापासून विचार करत होतो की मी हे करू शकणार नाही… माफ करा… आणि मला सर्व काही वेळेवर दिल्याबद्दल धन्यवाद… मी तुला खूप प्रेम करतो आई-बाबा… पण तेवढे पुरे झाले… मी आता ते करू शकत नाही… तुमची शेवटची भेट घ्यायची इच्छा होती. मात्र, मला भेटता येणार नाही, दीदीची काळजी घ्या. बाय…”  असा मजकूर 16 वर्षीय ख्वाहिशने लिहिलेल्या चिठ्ठीत आढळलाल, हा मेसेज वाचल्यानंतर अनेकांचे डोळे पाणवले.

नागपूरला नीटच्या तयारीसाठी आला होता

दरम्यान, ख्वाहिशला नुकतेच त्याच्या पालकांनी वैद्यकीय प्रवेशसाठी असलेल्या ‘नीट’च्या तयारीसाठी बालाघाटवरून नागपूरला पाठवले होते. तो हिलटॉप भागातील हॉस्टेलवाला या वसतिगृहत राहायला होता. मात्र, या घटनेनं शिक्षण क्षेत्रालाचा विचार करायला भाग पाडलं आहे, तर पोलिसांनी देखील पालकांना आपल्या पाल्ल्यांवर जबाबदारीचे ओझे न टाकण्याचे अवाहन केले.

हेही वाचा

पुन्हा मंत्रिमंडळात घ्या, धनजंय मुंडेंच्या बॅनरला जेसीबीतून दुग्धाभिषेक; गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव

शिक्षण कर्जाची माहिती:
शिक्षण कर्जाची गणना करा ईएमआय

आणखी वाचा

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.