असदुद्दीन ओवैसींना बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा धक्का बसला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेस-राजद नेतृत्व आणि महाआघाडीने एआयएमआयएम पक्षासोबत युती करण्यास नकार दिला आहे. काही दिवसांपूर्वी ओवेसींच्या पक्षाने बिहारमधील नेत्यांना पत्र लिहून महाआघाडीत सामील होण्याची इच्छा व्यक्त केली होती, मात्र त्यांना सकारात्मक उत्तर मिळालेले नाही.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरजेडी आणि काँग्रेसवाने जातीय पक्षाशी हातमिळवणी न करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच राज्यात तिसरी आघाडी स्थापन झाली तर ती भाजपच्या बी टीम असेल. हा मुद्दा प्रचारात कामी येऊ शकतो. यामुळे भाजपचा डाव त्यांच्यावरच उलटला जाण्याची शक्यता महाआघाडीच्या नेत्यांनी वर्तवली आहे.
एआयएमआयएमने लिहिले होते पत्र
एआयएमआयएमने लालूप्रसाद यादव यांना एक पत्र लिहिले होते, यात त्यांनी महाआघाडीत सामील होण्याची इच्छा व्यक्त केली होती. या पत्रात एआयएमआयएमचे प्रदेशाध्यक्ष अख्तरुल इमान यांनी म्हटले होते की, 2015 पासून AIMIM बिहारच्या राजकारणात सक्रिय आहे. आम्ही पहिल्या दिवसापासून धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होऊ नये यासाठी काम करत आहोत. अशा मतांच्या विभाजनामुळेच जातीय राजकारण करणाऱ्या पक्षांना सत्तेत येण्याची संधी मिळते’.
इमान यांनी पुढे म्हटले होते की, ‘2025 च्या विधानसभा निवडणुका आपल्यासमोर आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा AIMIM ला महाआघाडीत समाविष्ट करण्यात यावे अशी आमची इच्छा आहे. आपण एकत्रित विधानसभा निवडणुका लढवल्या तर आपण धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन रोखू आणि बिहारमध्ये पुढील महाआघाडीचे आणू.’ मात्र या पत्राला सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही.
असदुद्दीन ओवेसी स्वबळावर लढणार
असदुद्दीन ओवेसींनी बिहारमध्ये स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या बिहार विधानसभा निवडणुकीत आम्ही इंडिया आघाडीसोबत असणार नाही असं पक्षाकडून सांगण्यात आलं आहे. आता ओवेसी तिसऱ्या आघाडीच्या शोधात असल्याचीही माहिती समोर आली आहे. दरम्यान, गेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या वेळीही ओवैसींनी महाआघाडीत सामील होण्याची इच्छा व्यक्त केली होती, मात्र त्यांना त्यावेळीही अपयश आले होते.