Dadar Kabutarkhana : वेळ पडल्यास शस्त्र उचलू, धर्माविरोधात गेलात तर कोर्टाला मानत नाही; जैन मुनींचा उपोषणाचा इशारा
esakal August 11, 2025 12:45 AM

मुंबईत कबुतरखान्यांच्या परिसरात पक्ष्यांना धान्य टाकू नये असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. उच्च न्यायालयाच्या निर्णय़ानंतर शहरातील कबुतरखाने बंद केले असून धान्य टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. आता याविरोधात जैन समाज आक्रमक झाला असून उपोषण आणि आंदोलन करणार असल्याचं जैन समाजाच्यावतीने जाहीर करण्यात आलंय.

कबुतरखाने बंद करण्याच्या उच्च न्यायालयाच्या या निर्णय़ाविरोधात जैन समाज उपोषण करणार आहे. १३ तारखेपासून उपोषण आंदोलन सुरू करणार असल्याचा इशारा जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी दिला. वेळ पडली तर शांतताप्रिय असलेला समाज शस्त्रही हातात घेईल आणि कोर्टाच्या आदेशाला मानणार नाही अशा शब्दात जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी धमकीच दिली आहे.

Dadar : माझ्या कारवर कबुतरांना खाद्य देतोय, सरकार-न्यायालयाला काय प्रॉब्लेम; संकलेचावर गुन्हा, गाडी जप्त

जैन समाज हा शांतताप्रिय आहे, शस्त्र उचलायचं काम आमचं नाही. पण जे लोक शस्त्र उचलतात ते आमचे नाहीत. गरज पडल्यास धर्मासाठी आम्हीही शस्त्र उचलू. आम्ही भारताचं संविधान मानतो, कोर्टाला मानतो, देवेंद्र फडणवीसांना मानतो. पण आमच्या धर्माच्याविरोधात आलं तर आम्ही कोर्टालाही मानत नाही असंही निलेशचंद्र विजय यांनी म्हटलंय.

कबुतरं मरू नयेत, सरकारच्या आदेशानंतर पक्षांना खाद्य टाकणं सुरू झालंय. आमचं पर्युषण पर्व संपल्यानंतर आम्ही पुढचा निर्णय घेणार आहोत. देशभरातील जैन बांधव इथं येऊन आंदोलन करतील. जीवदया आमच्या धर्मात आहे. जैन धर्मालाच का लक्ष्य केलं जातंय? दारू कोंबड्या खाऊन किती लोक मरतात, हेसुद्धा दाखवा. मुंगीपासून हत्तीपर्यंत कोणताही जीव मरता कामा नये हे आमच्या धर्मात लिहिलंय असंही जैन मुनी निलेशचंद्र यांनी म्हटलं.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.