वंचितकडून आज पुण्यात महिला कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना वंचितच्या राष्ट्रीय नेत्या अंजली आंबेडकर यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत पक्षाची योजना काय असेल? युती कोणत्या पक्षासोबत करणार याबाबतही अंजली आंबेडकर यांनी माहिती दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
महिला कार्यकर्ता संवाद मेळाव्यात बोलताना अंजली आंबेडकर यांनी म्हटले की, महाराष्ट्रामध्ये अनेक घटना घडत आहे. वंचितांची वंचितता वाढतं असताना स्त्रियांचेही अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. हे प्रश्न हाताळण्यासाठी वंचित बहुजन महिला आघाडी सक्षमपणे उभी राहील. याची ही पुणे शहरातून सुरुवात होत आहे.
पुढे बोलताना अंजली आंबेडकर म्हणाल्या की, ‘लोकसभा निवडणूकांमध्ये संविधान वाचवण्याच्या एका मुद्द्यावर आंबेडकरी मतदान हे मोठ्या संख्येने काँग्रेस, महाविकास आघाडीकडे गेले होते. पण लोकसभेनंतर महाविकास आघाडीतील पक्षाने त्यांची सत्ता असणाऱ्या राज्यात आरक्षणासंदर्भात, तसेच वंचितांच्या प्रश्नासंदर्भात आवाज उठवला नाही. तेव्हापासूनच इथल्या मतदारांमध्ये मोठी निराशा झालेली आहे. यामुळे आता मतदार मोठ्या आशेने वंचित बहुजन आघाडीकडे बघू लागली आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कोणासोबत युती?अंजली आंबेडकर यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोणत्या पक्षासोबत युती करणार याबाबत महत्वाची माहिती दिली आहे. त्या म्हणाल्या की, वंचित बहुजन आघाडीने गेल्या तीन महिन्यांपासून सातत्याने जाहीर केलं आहे की, भाजप आणि भाजपसोबत सत्तेत असलेले पक्ष सोडून, इतर कुठल्याही पक्षाबरोबर युती करण्याचा आम्ही निर्णय घेऊ. याचे स्वातंत्र्य स्थानिक पातळीवर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
कोथरूडमधील मुलीला मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर आज वंचित महिला आघाडीने पोलिसांसोबत रक्षाबंधन सण साजरा केला. यावर बोलताना अंजली आंबेडकर म्हणाल्या की, ‘आंबेडकरी चळवळीतल्या महिला रक्षाबंधन करत नाहीत. याचं कारण स्वतःला आपलं मानन आणि दुसरं कोणालातरी आमची रक्षा करा असं सांगणं, ही वैचारिक दृष्ट्या आम्हाला न पटणारी भूमिका आहे. पण आत्ता आम्ही जी कृती करत आहे, ती म्हणजे महिलांचं रक्षण करण ज्या खात्याची जबाबदारी आहे, त्याच खात्याकडून कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये, तीन मुलींना अतिशय वाईट अनुभव आलेले आहेत. संविधानाची मूल्य आणि कायद्याची जबाबदारी जर पोलिसांना कळत नसेल, तर त्यांना जी सांस्कृतिक भाषा कळते. अशा भाषेमध्ये रक्षाबंधन करून तरी ते जबाबदारी घेतात का? हे बघण्यासाठी रक्षाबंधन साजरे करण्यात येत आहे.