Dhananjay Munde Letter To Devendra Fadnavis : मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर ओबीसींमध्ये अस्वस्थता आहे. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळाले तर ओबीसीमधील इतर जातींचे आरक्षण संपुष्टात येईल, असा दावा केला जात आहे. याच भीतीपोटी लातूर जिल्ह्यातील भरत महादेव कराड यांनी आत्महत्या केली आहे. आता करडा यांच्या आत्महत्येचा मुद्दा उपस्थित करून आमदार तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. मराठा आरक्षण आणि ओबीसींचा होत असलेला विरोध याची राज्यभरात चर्चा होत असताना आता मुंडे यांनी लिहिलेल्या पत्राला चांगलेच महत्त्व आले आहे.
धनंजय मुंडेंनी नेमकी काय मागणी केली?खुद्द धनंजय मुंडे यांनीच या पत्राबाबत माहिती दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिल्यानंतर मुंडे यांनी तेच पत्र एक्स या समाजमाध्यमावर टाकले आहे. तसेच ओबीसी समाजाचे आरक्षण धोक्यात आल्याचे नैराश्य मनात बाळगून आत्महत्या केलेल्या स्व. भरत महादेव कराड (रा. वांगदरी, ता. रेणापूर, जि. लातूर) यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारच्या वतीने 25 लाख रुपयांची आर्थिक मदत करावी, अशी मागणी फडणवीस यांच्याकडे केल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी दिली. तसेच त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय सेवेत पात्रतेनुसार नोकरी मिळवून द्यावी, अशीही मागणी पत्राद्वारे उपमुख्यमंत्री तसेच अजित पवार, एकनाथ शिंदे या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे केल्याचेही मुंडे यांनी सांगितले.
धनंजय मुंडे पत्रात नेमकं काय म्हणाले?ओबीसी समाजाचे आरक्षण धोक्यात आल्याचे नैराश्य मनात बाळगून आत्महत्या केलेल्या स्व. भरत महादेव कराड (रा. वांगदरी, ता. रेणापूर, जि. लातूर) यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारच्या वतीने २५ लाख रुपयांची आर्थिक मदत करावी तसेच त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय सेवेत पात्रतेनुसार… pic.twitter.com/PNx1s6Qr4W
— Dhananjay Munde (@dhananjay_munde)
धनंजय मुंडे यांनी आपल्या पत्रात भरत कराड यांनी आत्महत्या का केली? याचेही कारण सांगितले आहे. भरत कराड यांनी ओबीसी समाजाचे आरक्षण अबाधित राहावे यासाठी बलिदान दिले. मात्र त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. 2 सप्टेंबर रोजीच्या शासन निर्णयाचे अवलोकन करून ओबीसी समाजाचे आरक्षण धोक्यात आल्याचा समाज झाल्याने कराड यांनी टोकाचे पाऊल उचलले आहे. त्यामुळे सरकारने त्यांची मदत करावी, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे.
दरम्यान, आता धनंजय मुंडे यांच्या या मागणीनंतर आता सरकार नेमकी काय भूमिका घेणार? याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे.