काही दिवसांपूर्वी बीडमध्ये ओबीसी नेत्यांची महाएल्गार सभा पार पडली होती, या सभेत बोलताना ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी मोठं वक्तव्य केलं होतं. या सभेत बोलताना गोपीनाथ मुंडे यांचे राजकीय वारस म्हणून भुजबळ यांनी धनंजय मुंडे यांचा उल्लेख केला, त्यानंतर भुजबळ यांच्या या वक्तव्याची राज्यात चांगलीच चर्चा सुरू झाली आहे, यावर आता करुणा मुंडे यांची देखील प्रतिक्रिया समोर आली आहे. यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी धनंजय मुंडे यांचं कौतुक केलं आहे.
नेमकं काय म्हणाल्या करुणा मुंडे?
छगन भुजबळ यांनी 100 टक्के सत्य सांगितलं आहे. राजकारणामध्ये पोटचा वारसा नसून तो विचारांचा वारसा असतो, आणि आज ते धनंजय मुंडे यांनी सिद्ध करून दाखवले आहे, अशा शब्दात करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांचं कौतुक केलं आहे. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, घरामध्ये वाद झाला होता, मात्र धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडेंसारखच तळागाळामध्ये जाऊन स्वत:चे व्यक्तित्व निर्माण केलं. मी 2009 पासून ते 2019 पर्यंत हा संघर्ष पाहिला आहे.
गोपीनाथराव मुंडे साहेबांचा खरा राजकीय वारस हे धनंजय मुंडेच आहेत. आणि त्यांची सून म्हणून मी सुद्धा. धनंजय मुंडे यांनी आपलं कर्तव्य पार पाडलं. पंकजा मुंडेंना हरवण्यामध्ये भाजपाचा हात होता. त्यामध्ये पंकजा मुंडे यांचं खच्चीकरण झालं. त्यावेळी पंकजाताई डिप्रेशनमध्ये गेल्या होत्या, त्यावेळी एक भाऊ म्हणून त्यांनी आपलं कर्तव्य पार पाडलं. आणि दोघा बहीण भावांनी एकत्र मंत्रिपदाची शपथ घेतली. धनंजय मुंडे यांचा आणि माझा काही वाद नाही, त्यांच्या वृत्तीचा आणि माझा वाद आहे, असंही यावेळी करुणा मुंडे यांनी म्हटलं आहे.
आज एक नवीन पार्ट सुरू झाला आहे. मी प्रॉपर्टी विकून माझे मंगळसूत्र सुद्धा गहाण ठेवून या संघर्षामध्ये सहभागी झाले होते. पंकजाताई आज जरी म्हणाल्या मी वारसदार आहे, मुंडे साहेबांची तर नाही, धनंजय मुंडे हेच खरे राजकीय वारस आहेत, असं यावेळी करुणा मुंडे यांनी म्हटलं आहे.