AUS vs IND : पाचवा टी 20I सामना पावसामुळे रद्द, भारताने 2-1 ने मालिका जिंकली, कांगारुंचा अचूक हिशोब
Tv9 Marathi November 09, 2025 12:45 AM

अखेर ज्याची भीती होती तसंच घडलं आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील पाचवा आणि अंतिम टी 20I सामना हा पावसामुळे अखेर रद्द करण्यात आला आहे. उभयसंघातील हा सामना ब्रिस्बेनमधील द गाबा येथे आयोजित करण्यात आला होता. या सामन्यावर पावसाचं सावट होतं. या मैदानात पाऊस होणार असल्याची शक्यता 70 टक्के होती. सामन्यात 29 चेंडूंचा खेळ झाला. त्यानंतर हवामान आणि मग पावसामुळे खेळ थांबवण्यात आला. या पावसाच्या थांबवण्याची अनेक मिनिटं प्रतिक्षा करण्यात आली. मात्र वरुणराजाने विश्रांती न घेतल्याने अखेर सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बीसीसीआयने याबाबतची माहिती दिली आहे.

टीम इंडियाने मालिकेतील तिसरा आणि चौथा असे सलग 2 सामने जिंकून मालिकेत आघाडी घेतली होती. त्यामुळे भारताकडे पाचव्या सामन्यात विजयी हॅटट्रिक करण्याची संधी होती. मात्र पावसामुळे भारताची हॅटट्रिक हुकली. भारताने अशाप्रकारे ही मालिका 2-1 ने जिंकली. भारताने अशाप्रकारे एकिदवसीय मालिकेतील पराभवाची परतफेड केली. ऑस्ट्रेलियाने भारताला एकदिवसीय मालिकेत 2-1 फरकाने पराभूत केलं होतं.

पहिला आणि शेवटचा सामना पावसामुळे रद्द

उभयसंघातील टी 20i मालिकेतील एकूण 2 सामने हे पावसामुळे वाया गेले. मालिकेची सुरुवातही पावसाने आणि शेवटही पावसानेच झाला. पहिला सामना उभयसंघातील पहिला सामना 29 ऑक्टोबरला खेळवण्यात आला होता. या सामन्यात 9.4 ओव्हरनंतर पावसाने एन्ट्री घेतली. त्यानंतर पावसाने खेळ वाया घालवला. तर त्यानंतर आता पाचव्या आणि अंतिम सामन्यात पावसाने चाहत्यांचा हिरमोड केला.

पावसाने मालिकेतील दुसरा सामना जिंकला

🚨 The 5th T20I has been called off due to rain.#TeamIndia win the series 2-1 🏆

Scorecard ▶️ https://t.co/V6p4wdCkz1#AUSvIND pic.twitter.com/g6dW5wz1Ci

— BCCI (@BCCI)

पाचव्या सामन्यात काय झालं?

दरम्यान ऑस्ट्रेलियाच्या बाजूने पाचव्या आणि अंतिम सामन्यात नाणेफेकीच कौल लागला. कॅप्टन मिचेल मार्श याने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला आणि भारताला फलंदाजीसाठी भाग पाडलं. टीम इंडियाच्या शुबमन गिल आणि अभिषेक शर्मा या सलामी जोडीने वादळी सुरुवात केली. या दोघांनी चाबूक बॅटिंग केली. दोघांची फटकेबाजी पाहता टीम इंडिया सहज 200 पार पोहचेल, असं चित्र होतं. भारताने 4.5 ओव्हरमध्ये 52 रन्स केल्या. शुबमन 29 आणि अभिषेक 23 रन्सवर खेळत होते. मात्र तेव्हा खराब हवामानामुळे खेळ थांबवावा लागला. त्यानंतर पावसाने विघ्न घातलं. मात्र त्यानंतर तासाभर प्रतिक्षा केल्यानंतरही पाऊस न थांबल्याने सामना रद्द करण्यात आला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.