Eknath Shinde: फुकटचा टाटा, नाव उबाठा! एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर टीका
esakal November 13, 2025 08:45 PM

परभणी / जालना : ‘‘राज्यात शेतकऱ्यांच्या भेटी घेण्यासाठी सध्या बिनकामाचे लोक फिरत आहेत. हेच लोक परभणीतही आले होते. माझ्याकडे देण्यासाठी काही नाही म्हणणारे केवळ फुकटचा टाटा आणि नाव उबाठा असणारे लोक आहेत.

ओठावर भवानी आणि पोटात बेईमानी असणाऱ्यांनीच राज्यातील वातावरण दूषित केले आहे’’, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. दरम्यान, जालन्यातील मेळाव्यातही शिंदे यांनी ठाकरेंवर टीका केली.

अतिवृष्टी, पूरस्थितीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेल्या मदतीवरून ‘दगाबाज रे’ असा नारा देत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकताच चार दिवस मराठवाडा दौरा केला. हाच धागा पकडून येथे बुधवारी (ता. १२) झालेल्या संवाद मेळाव्यात शिंदे यांनी ठाकरेंवर टीकेचे बाण सोडले.

ते म्हणाले, ‘‘अतिवृष्टी, पूरस्थितीमुळे राज्यातील शेतकरी संकटात असताना त्यांना मदतीसाठी महायुती सरकार दिवसरात्र प्रयत्नशील आहे. शेतकऱ्यांसाठी आम्ही ३२ हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले असून, वितरण प्रक्रियाही सुरू आहे. कर्जमाफीसंदर्भातील प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल. असे असताना विरोधक आम्हाला दगाबाज म्हणतात, पण खरे दगाबाज तेच आहेत. त्यांनी शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधली, प्रकल्प बंद पाडले, योजनांना खो घातला. त्यामुळे आम्हाला उठाव करावा लागला. कारण जनतेचा विश्वासघात आम्हाला सहन होत नव्हता.’’

‘फुकाचा ताठा-उबाठा’

जालना ः जनता आपल्यासोबत आहे, हे जनतेने निवडणुकीत दाखवून दिले आहे. त्यांनी स्वतःचे आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण केले पाहिजे. ‘फुकाचा ताठा आणि उबाठा’ असे म्हणत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर येथील मेळाव्यात टीका केली. दरम्यान, शिवसेनेचे (उबाठा) जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांच्यासह अन्य काहींनी शिवसेनेत प्रवेश केला.

Minister Eknath Shinde: विरोधकांच्या ‘लवंग्यां’कडे लक्ष देत नाही: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; आगामी निवडणुकीत पूर्ण बहुमताने आमचीच सत्ता त्यांची जुनी ढोलकी फाटली

‘‘ओठांवर भवानी आणि पोटात बेईमानी असणाऱ्यांनी राज्यातील वातावरण दूषित केले असून हे लोक जनतेत गोंधळ निर्माण करण्याचे काम करत आहेत. राज्यातील विरोधकांची जुनी ढोलकी आता फाटली आहे. दिल्लीतील स्फोटामुळे देश चिंतेत असताना विरोधकांना त्यातही राजकारण करायचे आहे, हे अत्यंत दुर्दैवी आहे. जनता सर्व पाहत आहे. फसवणाऱ्यांना जनता आता माफ करणार नाही,’’ असेही शिंदे म्हणाले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.