बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल काल जाहीर झाले. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सत्तेवर कायम राहणार आहे. 243 सदस्यांच्या बिहार विधानसभेत एनडीएने या निवडणुकीत 200 पेक्षा जास्ता जागा जिंकल्या आहेत. महाआघाडीला फक्त 35 जागांवर समाधान मानावं लागलय. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवण्यात आली होती. 20 वर्षानंतरही त्यांची जादू कायम आहे. खरंतर इतक्या वर्षाच्या सत्तेनंतर प्रस्थापित सरकारविरोधी लाट असते. पण या निवडणुकीत असं काही दिसलं नाही. 2020 च्या तुलनेत उलट 2025 मध्ये जागा जिंकल्या आहेत. बिहारच्या या निकालावर आता शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“या निवडणुकीच मतदान झालं. त्याच्यानंतर मी काही लोकांशी बोललो होतो. त्यांच्याकडून मला फिडबॅक मिळाला. या निवडणुकीच मतदान महिलांनी हातात घेतलं होतं. मला एक अशी शंका होती, ज्या अर्थी महिलांनी इतक्या मोठ्या प्रमाणात सहभाग दिला, याचा अर्थ ही 10 हजार रुपयाची योजना आहे. सगळ्या महिलांच्या खात्यात 10-10 हजार रुपये भरले. त्याचा हा परिणाम असावा” अशी पहिली प्रतिक्रिया शरद पवारयांनी बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालावर दिली.
एवढ्या मोठ्या प्रमाणावर पैशाचं वाटप करणं योग्य आहे का?
“महाराष्ट्रात लाडकी बहीण झाली. तसंच बिहारमध्ये झालं आहे. इथून पुढच्या निवडणुकीत ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांनी मतदानाच्या आधी अशा पद्धतीने पैशाचं वाटप करून निवडणुकीला सामोरे जायचं ठरवलं तर निवडणूक पद्धतीबद्दल लोकांच्या मनात धक्का बसेल याची चिंता आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर पैशाचं वाटप करणं योग्य आहे का? याचा विचार जाणकारांनी केला पाहिजे. निवडणूक आयोगानेही याचा विचार करावा. निवडणुका स्वच्छ पारदर्शक व्हाव्यात. पण 10-10 हजार रुपये ही काही लहान रक्कम नाही. याचा परिणाम काय होतो तो पाहिलं पाहिजे” असं शरद पवार म्हणाले.
बारामतीचा काय किस्सा सांगितला?
“एकेकाळी म्हणजे 50 वर्षापूर्वी बारामतीचं वैशिष्ट्ये होतं की म्युनिसिपालटीची निवडणूक आली तर मतदानाच्या आदल्या दिवशी लोक वाट पाहायचं. वाटप झालं की निकाल कसा यायचा ते दिसायचं. पण आता संबंध राज्यात 10-10 हजार रुपये देणं आणि निवडणुकीला सामोरे जाणं याचा अर्थ या निवडणुका पारदर्शक आणि स्वच्छ नव्हत्या हे लोकांच्या मनात आहे. याचा विचार निवडणूक आयोगाने केला पाहिजे” असं शरद पवार म्हणाले.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत युती करणार का?
“राज्यात पंचातय आणि नगरपरिषदेच्या निवडणुका येतील. पार्टी म्हणून या निवडणुका लढवल्या जातात. राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने आम्ही निर्णय घेतला की त्या तालुका आणि जिल्ह्यात पक्षाचे सहकारी आहेत त्यांनी निवडणुकीबाबतचा निर्णय घ्यावा” असं शरद पवार म्हणाले. मुंबईत काँग्रेसने स्वबळाचा निर्णय घेतला आहे, त्यावर शरद पवार म्हणाले की, ‘मुंबई महापालिकेची निवडणूक जाहीर झाला नाही. त्याबाबत तेव्हा निर्णय घेतील’
पण हे योग्य आहे का?
“10 हजार रुपये प्रत्येकी वाटणं. याचा अर्थ काय? निवडणुका जाहीर होण्याच्या आधी या पैशाचं वाटप झालं. पण हे योग्य आहे का? हा पैसा कुठला? सरकारी तिजोरीतला. विकासकामासाठी पैसा वापरला पाहिजे. पण वाटले गेले. याचा अर्थ निवडणुका गैरमार्गाने लढवल्या जात आहेत. संसदेचं अधिवेशन सुरू होईल. तेव्हा आम्ही एकत्र बसून त्याचा विचार करू” असं शरद पवार म्हणाले.